

Pahalgam Terror Attack
श्रीनगर : पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधून पर्यटक माघारी परतत आहेत. या हल्ल्यानंतर दिल्ली आणि मुंबई ते श्रीनगर विमान प्रवास भाड्यात २० ते ३० टक्के घट झाली आहे, असे गुगल फ्लाइट्सच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.
मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर २५ एप्रिल ते २५ मे दरम्यानच्या कालावधीतील विमान प्रवास भाड्यात दोन अंकी घसरण नोंदवण्यात आली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार, विमान कंपन्यांनी श्रीनगर येथून ये- जा करणाऱ्या विमानांची संख्येत वाढ केली. बुकिंग रद्द करण्याचे आणि प्रवासाची वेळ बदलण्याचेही शुल्क माफ करण्यात आले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) आकडेवारीनुसार, जम्मू काश्मीरच्या श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज ४५ ते ५० विमाने उतरतात.
गुगल फ्लाइट्सकडील आकडेवारीनुसार, २५ एप्रिल ते १ मे दरम्यानच्या ७ दिवसांसाठी दिल्ली-श्रीनगर विमान प्रवास भाडे सरासरी ४,७२० रुपये ते ५,८५९ असे आहे. १५ दिवसांच्या आगाऊ कालावधीसाठी ४,७१५ ते ५,३४५ आणि ३० दिवसांच्या आगाऊ कालावधीसाठी ६,६७० रुपये ते ८६४० रुपये प्रवास भाडे आहे. या कालावधीत सामान्यपणे ६,६०० रुपये ते ११ हजार रुपये प्रवास भाडे असते.
मुंबई ते श्रीनगर दरम्यान ७ दिवसांच्या आणि १५ दिवसांच्या आगाऊ कालावधीसाठी सरासरी विमानभाडे ४,७७५ रुपये आहे. ३० दिवसांच्या आगाऊ कालावधीसाठी ४,७७५ रुपये ते ११,८१० रुपये आहे. सामान्यपणे या कालावधीत या मार्गावरील सरासरी विमान भाडे १०,५०० रुपये ते १७,५०० रुपये असते.
ट्रॅव्हल एजंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (TAFI) चे अध्यक्ष अजय प्रकाश यांनी म्हटले आहे की, पहलगाम हल्ल्याचा परिणाम काश्मीर खोऱ्यातील पर्यटनावर होणार आहे. गेल्या काही वर्षांत हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ ठरले आहे. "काही दिवसांतच विमान कंपन्यांच्या व्यवसायावर लक्षणीय परिणाम होईल. प्रवाशांची संख्या कमी झाल्यास विमानांच्या फेऱ्याही कमी होऊ शकतात. याचा परिणाम म्हणून इतर लोकप्रिय पर्यटन स्थळांना जाण्यासाठी विमान प्रवास भाड्यात वाढ होऊ शकते," असे प्रकाश यांनी सांगितले.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काही विमान कंपन्यांनी जम्मू काश्मीरमधून बाहेर जाणाऱ्या विमानांचे दर वाढवले होते. याची गंभीर दखल घेत नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी भाडेवाढ टाळण्यासाठी विमान कंपन्यांना कडक सूचना दिल्या. सर्व विमान कंपन्यांना नियमित भाडे कायम ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. दरम्यान, गेल्या बुधवारी इंडिगो, एअर इंडिया, स्पाइसजेट यांनी श्रीनगरला ये-जा करण्यासाठी अतिरिक्त विमान सेवा उपलब्ध केली होती.