

'विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने केले विविध संस्थांच्या अहवालांचे विश्लेषण
मागील वर्षातील आकडेवारीच देते ऋतू बदलाचा पुरावा
देशातील बहुतांश ठिकाणी हिवाळ्यातील किमान तापमानातील वाढ चिंताजनक
ऋतूचक्राच्या अस्तित्वालाच आव्हान
climate change India
नवी दिल्ली : विविध ऋतूचक्रांनी नटलेला देश अशी भारताची पारंपारिक ओळख आहे. ऋतू बदलावरच आपल्याकडे अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात. आता हेच ऋतूचक्र पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पृथ्वीच्या वाढत्या उष्णतेमुळे निसर्गाची हक्काची लय हरवत चालली आहे, अशी धोक्याची सूचना 'विज्ञान आणि पर्यावरण केंद्र' (CSE) आणि 'डाउन टू अर्थ' यांच्या नवीन रिपोर्टने दिली आहे.
हवामान विभाग आणि सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीचा अभ्यास करून 'विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने एक अहवाल तयार केला आहे. २०१२ ते सप्टेंबर २०२५ या सुमारे १,५०० दिवसांमधील हवामानातील बदलांचा एक नकाशातून अतिशय धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
भारतामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू स्पष्टपणे वेगळे जाणवायचे; पण आता पृथ्वीच्या वाढत्या उष्णतेमुळे निसर्गाची हक्काची लय हरवत चालली आहे. हे ऋतू एकमेकांत मिसळले आहेत. म्हणजेच, कधीही पाऊस पडतोय तर कधी ऐन हिवाळ्यात उन्हाळा जाणवतोय.
'विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने एक अहवालातील आकडेवारीवरून असे दिसून येते की, २०२५ वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत (जानेवारी ते सप्टेंबर) देशात सुमारे ९९ टक्के दिवस अतिवृष्टीचा अनुभव आला. या २७३ दिवसांपैकी, असा एकही दिवस नव्हता जेव्हा भारताच्या काही भागात अतिवृष्टी, उष्णतेची लाट, गारपीट किंवा चक्रीवादळ यासारख्या आपत्तीचा तडाखा बसला नसेल. गेल्या चार वर्षांत भारतात प्रथमच जवळजवळ संपूर्ण वर्षभर अतिवृष्टीच्या घटनांची नोंद झाली आहे. २०२३ मध्ये फक्त सहा राज्यांमध्ये अशा घटना घडल्या, तर २०२५ मध्ये देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रभावित झाले. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये ५९ पैकी ५७ दिवस अतिवृष्टीच्या घटना नोंदवल्या गेल्या.
ऋतू बदलाचा आणखी एक पुरावा म्हणजे कडक हिवाळ्यातही देशाच्या काही भागात उष्णतेच्या लाटा अनुभवल्या गेल्या. मान्सून आता केवळ पावसाळीच नाही तर तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटा देखील अनुभवत आहेत. नोव्हेंबरपर्यंत पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण खरीप आणि रब्बी पिकांच्या कापणीत व्यत्यय आला आहे.
हवामान बदलामुळे भारताचा नैसर्गिक नकाशाच बदलू लागला आहे. पूर्वी १० वर्षांतून एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती येत असेल. मात्र आता राजस्थान आणि लेह सारख्या वाळवंटी भागात आता पूर येत आहेत, तर हिमालय आणि इतर डोंगराळ भागांत आता वर्षभर खूप उष्णता जाणवते. यामुळे हिमनद्या वेगाने वितळत असून तिथल्या निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे.
मानवी इतिहासात कधीही नव्हती इतकी घातक वायूंची (Greenhouse Gases) पातळी आज पृथ्वीच्या वातावरणात वाढली आहे. आताच कठोर पावले उचलली नाहीत, तर आपल्या प्रगतीचा आधार असलेले 'ऋतूचक्र' कायमचे नष्ट होऊ शकते, असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे.
हवामानातील हे बदल आता केवळ कागदावर किंवा आकडेवारीपुरते राहिलेले नाहीत, तर आपल्या दैनंदिन जगण्यावर त्याचा थेट परिणाम होत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी आता जूनमध्ये पेरणी करायला घाबरत आहेत. कधी पाऊस उशिरा येतो, तर कधी तयार झालेले पीक अवकाळी पावसामुळे मातीमोल होत असल्याचे वास्तव आहे. उन्हाचा चटका इतका वाढला आहे की, मार्च महिना संपण्यापूर्वीच अनेक ठिकाणी शाळांना सुट्ट्या द्याव्या लागत आहेत.