

India Bangladesh border
कोलकाता: भारत-बांगलादेश सीमेवरील दलदलीचा प्रदेश आणि नद्यांच्या भागातून होणारी घुसखोरी अन् तस्करी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दल आता निसर्गाची मदत घेण्याच्या तयारीत आहे. या दुर्गम भागात कुंपण घालणे कठीण असल्याने, घुसखोरांना अटकाव करण्यासाठी नैसर्गिक अडथळा म्हणून साप आणि मगरींचा वापर करण्याबाबत बीएसएफच्या वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे. अद्याप याबाबत कोणताही अधिकृत आदेश जारी करण्यात आला नसला तरी, सीमा सुरक्षेसाठी हा एक अभिनव प्रयोग ठरण्याची शक्यता आहे.
भारत आणि बांगलादेश दरम्यान ४,०९६ किलोमीटरची सीमा आहे. यापैकी सुमारे १७५ किलोमीटरचा परिसर हा नद्या, नाले आणि दलदलीने व्यापलेला आहे. अशा ठिकाणी भौतिक कुंपण किंवा भिंत उभारणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरते. याचाच फायदा घेऊन घुसखोर आणि तस्कर या भागातून मोठ्या प्रमाणावर अवैध हालचाली करतात. यावर उपाय म्हणून, बीएसएफने अशा संवेदनशील भागांची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे जिथे साप किंवा मगरी सोडणे सुरक्षित आणि प्रभावी ठरू शकेल.
केवळ नैसर्गिक पर्यायांवर अवलंबून न राहता, बीएसएफने आपली देखरेख यंत्रणा अधिक सक्षम केली आहे. सीमेवर ड्रोन, हाय-टेक सेन्सर्स, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर आधुनिक सुरक्षा उपकरणांचा वापर वाढवण्यात आला आहे. 'डिटेरेन्स-फर्स्ट' या धोरणांतर्गत ही पावले उचलली जात आहेत.
पूर्व सीमेवर गेल्या काही महिन्यांत तस्करीच्या मोठ्या कारवाया उघडकीस आल्या आहेत. जानेवारी २०२६ मध्ये पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात ३२ व्या बटालियनने धडक कारवाई करत १ कोटी रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे जप्त केली होती. गुप्तचर माहितीच्या आधारे सापळा रचून एका तस्कराला सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले होते. त्याआधी नोव्हेंबर २०२५ मध्ये नादिया जिल्ह्यातच एका चकमकीत बांगलादेशी तस्कर ठार झाला होता. तस्करांनी बीएसएफ जवानांवर हल्ला केल्यानंतर स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात ही घटना घडली होती. यावेळी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली होती.