
नवी दिल्ली : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी शिगेला पोहोचली आरोप करत काँग्रेसने एनडीए सरकारवर शनिवारी हल्लाबोल केला. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २००५ मध्ये बिहारमध्ये एकूण गुन्हे १ लाख ७ हजार ६६४ होते. तर २०२२ मध्ये गुन्ह्यांची संख्या ३ लाख ४७ हजार ८३५ पर्यंत वाढली आहे. म्हणजेच गुन्ह्यांच्या संख्येत ३२३ टक्क्यांनी वाढ झाली, असे काँग्रेसने म्हटले.
बिहारमधील व्यापारी गोपाल खेमका यांची पाटण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यावरुन विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष असलेले अखिलेश प्रसाद सिंह यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेत सत्ताधारी एनडीएवर हल्लाबोल केला. एकेकाळी बिहार शांती, सौहार्द, ज्ञान आणि तपस्येचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते. मात्र, आज गुन्हेगारी वाढली असल्याचे ते म्हणाले. अल्पवयीन मुलींवर सतत बलात्कार होतात, टोळीयुद्धे होतात, पोलिसांची जाहीरपणे हत्या केली जाते, असे ते म्हणाले.
अखिलेश प्रसाद सिंह म्हणाले की, राजधानी पाटण्यामध्ये यावर्षी ११६ खून, ४१ बलात्कार झाले आहेत. गेल्या वर्षी पोलिस मुख्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १५१ दिवसांत पोलिसांवर १,२९७ हल्ले झाले. एनडीएच्या १७ वर्षांच्या राजवटीत ५३ हजार हून अधिक खून झाले. खुनाच्या प्रयत्नाच्या बाबतीत बिहार देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. १७ वर्षात एकूण ९८,१६९ खूनाच्या घटना घडल्या, म्हणजेच २६२ टक्क्यांनी वाढ झाली. बिहारमध्ये खून, बलात्कार, अपहरण, खंडणी, दरोडा यासारख्या जघन्य गुन्ह्यांमध्येही २२६ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे ते म्हणाले. महिलांवरील गुन्ह्यांमध्येही ३३६ टक्क्यांनी वाढ झाली, एकूण २ लाख २१ हजार ७२९ महिला गुन्ह्यांच्या बळी ठरल्या आहेत, असे ते म्हणाले. दलित अत्याचाराच्या बाबतीत बिहार पुन्हा उत्तर प्रदेशानंतर दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे ते म्हणाले.