

Bengaluru crime news
बेंगळूर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे एका तरुणाच्या भावाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विधी शाखेच्या विद्यार्थिनीचा, ४८ तासांहून अधिक काळ मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रुग्णालयात मृत्यू झाला. १३ जुलै रोजी एचएएल रोडवरील कोडिहल्ली भागात हा हल्ला झाला होता.
अमृता असे मृत तरुणीचे नाव असून, १३ जुलैच्या संध्याकाळी तिच्यावर हल्ला करण्यात आला होता. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, तरीही बुधवारी संध्याकाळी तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, अमृता, संशयित आरोपी धनुष आणि त्याचा धाकटा भाऊ सूर्या हे सर्वजण एकाच परिसरात राहतात. धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने दोन्ही कुटुंबांची ओळख झाली होती. यातून अमृता आणि धनुष यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली आणि पुढे त्याचे रूपांतर प्रेमसंबंधांत झाले.
मात्र, धनुषने आपल्या भूतकाळातील एक महत्त्वाची बाब लपवून ठेवल्याचे अमृताला समजल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. धनुषचे आधी लग्न झाले होते, त्याचा घटस्फोट झाला होता आणि त्याला एक मूलही होते. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर अमृताने हे नाते संपवले होते आणि त्याच्यापासून दूर राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृताच्या या निर्णयामुळे सूर्या संतापला होता आणि त्याने धमकी दिली होती की, आपल्या भावाचे प्रेम नाकारल्याबद्दल तो तिला सोडणार नाही.
१३ जुलै रोजी अमृताच्या घरी वाद झाला. यादरम्यान, सूर्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला; त्याने तिच्या छातीवर आणि पाठीवर वार केले आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी त्याला पकडले. तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, ४८ तासांहून अधिक काळ तिच्यावर उपचार सुरू होते मात्र काल संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर, जेबी नगर पोलिसांनी धनुष आणि सूर्या या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.