

Ayodhya Temple Funds Scam
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगीच्या चोरीवर आरएसएसने केलेले वक्तव्य हे 'मगरीचे अश्रू' आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेसने आज (दि. ४) हल्लाबोल केला. भाजप-आरएसएस हे श्रीरामाचे उपासक नसून सनातन धर्म आणि रामभक्तांचा विश्वासघात करणारे व्यापारी आहेत, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.
काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत, उत्तर प्रदेश काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आराधना मिश्रा म्हणाल्या की, आरएसएस-भाजप मगरीचे अश्रू ढाळून या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु रामभक्त त्यांना माफ करणार नाहीत. त्या म्हणाल्या की, दत्तात्रेय होसबळे यांनी टेलिप्रॉम्प्टरवर लिहिलेले निवेदन वाचले, परंतु यामुळे आरएसएस या गंभीर पापापासून आणि जबाबदारीतून मुक्त होत नाही. त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मौनावरही टीका केली.
आरएसएसला या घटनेचे दुःख झाले असेल, तर त्यांनी ट्रस्टच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली आहे? त्यांच्याविरुद्ध एफआयआर का दाखल केला नाही? असे सवाल आराधना मिश्रा यांनी केला.
मंदिरातील आर्थिक अनियमिततेवर तीव्र टीका करताना, आराधना मिश्रा यांनी ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, देशभरातून मिळालेल्या देणग्या, १,२५० रत्ने आणि कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांचा कोणताही हिशोब ठेवण्यात आला नाही. ट्रस्टला आरटीआयच्या कक्षेतून वगळण्यात आले होते. त्यांच्या मते, ही आरएसएसची एक प्रथा आहे, कारण ते नोंदणीकृतही नाही आणि त्याचे ऑडिटही झालेले नाही. मंदिरातून लुटलेले कोट्यवधी रुपये कुठे गेले, असा प्रश्न आराधना मिश्रा यांनी यावेळी उपस्थित केला.