Raj Thackeray: राम मंदिरातील गैरव्यवहारावर पंतप्रधानांचं मौन का? भक्तांच्या पैशांचा हिशेब कोण देणार? राज ठाकरेंचा सवाल

Raj Thackeray on Ram Temple Donation Controversy: अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहारावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
Raj Thackeray
Raj Thackeray Pudhari
Published on
Updated on

Raj Thackeray on Ram Temple Donation Controversy: अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणग्या आणि हुंडीत जमा होणाऱ्या निधीच्या कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणात विशेष तपास पथकाच्या (SIT) प्राथमिक अहवालाचा उल्लेख करत, मंदिरातील देणगी, दागदागिने आणि आर्थिक व्यवहारांची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या सविस्तर भूमिकेत म्हटले आहे की, अयोध्येतील श्रीराम मंदिरात भक्तांकडून मोठ्या प्रमाणावर देणग्या, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू अर्पण केल्या जातात. मात्र, या सर्वांचा योग्य हिशेब ठेवला जात नसल्याचे आरोप समोर आले असून, या प्रकरणातील कथित गैरव्यवहाराबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका मांडली जात नसल्याचे त्यांनी नमूद केले.

'पंतप्रधान आणि भाजप नेते मौन का?'

या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नसल्याचा दावा करत ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. राम मंदिराच्या उभारणीचे राजकीय श्रेय घेणाऱ्यांनी मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहारावरही तितक्याच स्पष्टपणे बोलणे अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले.

'राम मंदिर हे संपूर्ण हिंदू समाजाचे'

राम मंदिर उभारणीसाठी देशभरातील लाखो रामभक्त, करसेवक, संत-महंत आणि सामान्य नागरिकांनी योगदान दिल्याची आठवण करून देत ठाकरे म्हणाले की, हे मंदिर कोणत्याही एका पक्षाचे किंवा संघटनेचे नसून संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेचे प्रतीक आहे.

भक्तांनी मंदिरात अर्पण केलेला प्रत्येक रुपया हा त्यांच्या कष्टाचा आणि श्रद्धेचा असतो. अनेक महिलांनी आपल्या स्त्रीधनातूनही दागिने अर्पण केले असतील. त्यामुळे या निधीच्या वापराबाबत संपूर्ण पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

'श्रद्धेला धक्का बसू नये'

राज ठाकरे यांनी आरोप केला की, मंदिरांतील देणग्यांबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित होत असतात. त्यामुळे संबंधित विश्वस्त, व्यवस्थापन आणि जबाबदार अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे गरजेचे आहे. श्रद्धेचा गैरवापर होऊ नये आणि भक्तांचा विश्वास कायम राहावा, यासाठी कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

'मंदिरांच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आवश्यक'

देशातील अनेक मंदिरांच्या व्यवस्थापनावर यापूर्वीही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असल्याचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले की, मंदिरातील आर्थिक व्यवहार पूर्णपणे पारदर्शक असावेत. श्रद्धाळूंनी दिलेल्या देणगीचा योग्य उपयोग होत आहे की नाही, याची नियमित तपासणी आणि लेखापरीक्षण होणे आवश्यक आहे.

Raj Thackeray
Ram Mandir Donation Scam | श्रद्धेवर आघात!

राजकीय संदर्भाचाही उल्लेख

या प्रकरणाचा आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या राजकारणाशीही संबंध जोडला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करत ठाकरे यांनी भाजपमधील अंतर्गत राजकारणावरही भाष्य केले. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रामभक्तांच्या श्रद्धेचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निष्पक्ष चौकशीची मागणी

राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, तसेच या प्रकरणात सत्य काय आहे, हे देशातील रामभक्तांसमोर स्पष्ट केले जावे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news