दिल्ली मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे कारण सीबीआयने शनिवारी सांगितले. तपास यंत्रणेने सांगितल्यानुसार या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. फक्त दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेची चौकशी करायची बाकी आहे. त्यामुळे त्यांना अटक केल्याचे सीबीआयने म्हटले. तर सीबीआयचे वकील डी. पी. सिंह म्हणाले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाला ४ जूननंतर घडलेल्या काही नवीन घडामोडींची माहिती देऊ, ज्यामुळे आम्हाला अरविंद केजरीवाल यांना अटक करावी लागली.
दरम्यान, ५ जुलैला अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी न्यायमूर्ती नीना बन्सल यांच्या खंडपीठाने मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयकडून सात दिवसांत उत्तर मागितले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ जुलै रोजी होणार आहे.
सीबीआयच्या या उत्तरानंतर अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचा एक व्हिडिओ आम आदमी पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवर जारी केला. एनडीएच्या एका खासदाराने आपले उत्तर बदलल्यामुळे अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. संबंधित खासदारांवर उत्तर बदलण्यासाठी दबाव आणला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी ईडी आणि सीबीआय सारख्या तपास संस्थांचा कसा गैरवापर करतात, हे यातून स्पष्ट होते, असे म्हणत सुनीता केजरीवाल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला.
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत सीबीआयचे वक्तव्य समोर आल्यानंतर सुनीता केजरीवाल यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला. यामध्ये सुनीता केजरीवाल यांनी म्हटले आहे की, “एनडीएचे खासदार मागुंता श्रीनिवासुलू रेड्डी यांनी भीतीपोटी आपले वक्तव्य बदलले होते. त्यामुळे केजरीवाल यांना अटक करण्यात आली. सप्टेंबर २०२२ मध्ये ईडीने श्रीनिवासुलू रेड्डी यांच्या संपत्तीवर छापे टाकले होते. ईडीने त्यांना केजरीवालांना कधी भेटले होते का, असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर रेड्डी हो म्हणाले. रेड्डींना दिल्लीत चॅरिटेबल ट्रस्ट उघडायची होती आणि त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यावर जमीन नायब राज्यापालांकडे आहे, पाहुया असे उत्तर केजरीवालांनी दिले होते. मात्र रेड्डी यांचे उत्तर ईडीला आवडले नाही. काही दिवसांनी ईडीने रेड्डी यांच्या मुलाला अटक केली. काही दिवसानी ईडीने रेड्डी यांना पुन्हा विचारपूस केली. मात्र ते आपल्या उत्तरावर ठाम होते. कारण तेच सत्य होते. त्यामुळे रेड्डी यांच्या मुलाचा जामीन फेटाळला जात होता. या धक्क्यामुळे रेड्डी यांच्या सुनेने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. वृद्ध आई आजारी पडली. हे बघून रेड्डींचे मन हेलावले आणि जुलै २०२३ रोजी रेड्डी यांनी ईडीसमोर आपले आपले म्हणणे बदलले.
रेड्डींनी दिलेल्या उत्तरानुसार १६ मार्च २०२१ रोजी ते केजरीवाल यांना भेटले. त्यांच्याशी पाच मिनिटे बोलले. तिथे १०-१२ लोक बसले होते. तेव्हा केजरीवाल यांनी रेड्डींना दिल्लीत दारूचा व्यवसाय सुरू करण्यास सांगितले. त्या बदल्यात आम आदमी पक्षाला १०० कोटी रुपये द्या, असे सांगितले. या वक्तव्यानंतर दुसऱ्याच दिवशी रेड्डी यांच्या मुलाला जामीन मिळाला. मात्र केवळ मुलाला जामीन मिळावा यासाठी रेड्डींनी उत्तर बदलले होते.” असा आरोप सुनिता केजरीवाल यांनी केला.