

Ahmedabad Plane Crash Report : १२ जून २०२५ रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताच्या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) ने प्रसिद्ध केला आहे. या दुर्घटनेत २६० जणांचा मृत्यू झाला होता. प्रकाशित झालेल्या १५ पानांच्या अहवालात अपघाताच्या चौकशीचे प्राथमिक निष्कर्ष आणि स्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.
उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान विमानतळाजवळील वैद्यकीय वसतिगृह संकुलात कोसळले. AAIB च्या १५ पानी प्राथमिक चौकशी अहवालानुसार, विमानाच्या डेटा रेकॉर्डरच्या तपासणीत असे आढळून आले की, उड्डाणानंतर काही सेकंदांतच दोन्ही इंजिनांनी काम करणे थांबवले. कारण त्यांना होणारा इंधन पुरवठा खंडित झाला होता. रॅम एअर टर्बाइनमुळे (RAT) विमानाच्या वीज पुरवठ्यात अडथळा आल्याचे संकेत मिळाले, जे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. विमान अपघात अन्वेषण ब्युरोने (AAIB) १२ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध केलेला प्राथमिक चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. एअर इंडिया नियामक आणि इतर संबंधित घटकांसोबत मिळून काम करत आहे. तपासात प्रगती होत असताना कंपनी AAIB आणि इतर अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत राहील, असेही एअर इंडियाने म्हटले आहे.
कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये एक वैमानिक विचारताना ऐकू येते, "तुम्ही स्विच बंद का केले?" त्यावर दुसरा वैमानिक उत्तर देतो, "मी बंद केले नाही." त्यामुळे, इंधन नियंत्रण स्विच नेमके बंद कसे झाले, हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
अहवालानुसार, वैमानिकांनी इंजिन पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न केले. एक इंजिन काही काळासाठी सुरू झाले, परंतु दुसरे सुरू होऊ शकले नाही. अपघातापूर्वी विमान ३२ सेकंद हवेत होते. विमानाच्या थ्रस्ट लिव्हरसुद्धा निष्क्रिय अवस्थेत आढळले, ज्यामुळे त्यात बिघाड असल्याचे सूचित होते. टेकऑफच्या वेळी विमानाला पूर्ण थ्रस्ट मिळाला होता. इंधनात कोणतीही भेसळ आढळली नाही. विमानाची फ्लॅप सेटिंग ५ अंश आणि गिअर 'डाऊन' (खाली) स्थितीत होते, जी उड्डाणासाठी योग्य स्थिती मानली जाते.इंधन स्विचमधील संभाव्य बिघाडासंदर्भात एफएफएने (FFA) सूचना दिली होती, परंतु एअर इंडियाने त्याची तपासणी केली नव्हती. विमानाचे वजन निर्धारित मर्यादेत होते आणि विमानात कोणताही धोकादायक माल नव्हता.
अहवालानुसार, विमानाला कोणताही पक्षी आदळल्याचे सूचित करणारा कोणताही पुरावा आढळलेला नाही. हवामान स्वच्छ होते आणि वाऱ्याचा वेगही कमी होता. दोन्ही वैमानिकांकडे पुरेसा उड्डाण अनुभव होता. प्राथमिक अहवालात घातपाताचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.