

Ethanol Blending in Petrol: जगभरात तणावाचे वातावरण असून भारतासह अनेक देशांना आपल्या उर्जेची गरज भागवण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशात कच्च तेल आणि गॅसचा तुटवडा भासू शकतो अशा परिस्थितीत पुन्हा एकदा इथेनॉल मिश्रित पेट्रोलची चर्चा जोर धरू लागली आहे.
ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशन अर्थात AIDA ने केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात एकच मागणी करण्यात आली आहे. त्यांनी पेट्रोलमधील इथेनॉलची २० टक्के मात्रा वाढवण्यात यावी अशी मागणी केली आहे. फ्लेक्स फ्युअल बेस वाहनांवरच जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं देखील या पत्रात म्हटलं आहे. आता प्रश्न फक्त तेलाचा नाही तर देशाच्या उर्जा सुरक्षेचा देखील आहे.
जगभरात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ उतार होत आहे. इराण, इस्त्रायल अमेरिका युद्धामुळं भारताने आता आपल्या तेलाच्या ऑप्शनबाबत अजून विचार करायला हवा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. २३ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणात भारताने दशकभरापूर्वी केलेल्या तयारीचा आता होत असलेला फायदा सांगितलं.
मोदींनी भारताने गेल्या ११ वर्षात आपल्या उर्जा आयातीचे डायव्हर्सिफिकेशन केलं आहे. आधी क्रुड ऑईल, एलपीजी, एनएनजी अशा उर्जा गरजांसाठी २७ देशातून आयात केलं जात होतं. आता भारत ४१ देशांमधून उर्जा गरजांसाठी आयात करत आहे.
मोदी इथेनॉल बाबत देखील बोलले, त्यांनी, 'संकट काळात देशाला अजून एक गोष्ट कामी येत आहे. गेल्या काही वर्षात आपण इथेनॉलचे उत्पादन वाढवलं असून त्याचे पेट्रोलसोबत ब्लेंडिंग देखील चांगल्या पद्धतीनं केलं आहे. दशकापूर्वी पेट्रोलमध्ये फक्त १ ते २ टक्के इथेनॉल वापरलं जात होतं. मात्र आता ही टक्केवारी आपण २० टक्क्यांपर्यंत आणली आहे. त्यामुळं वर्षाला जवळपास साडे चार कोटी बॅरेल पेट्रोल कमी आयात करावं लागतं.'
पंतप्रधानांच्या या भाषणानंतर आता AIDA ने सरकारला इथेनॉलचा वापर वाढवण्यात यावा अशी मागणी करणारे पत्र लिहिले आहे.
AIDA आपल्या पत्रात म्हणते की, भारताने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे टार्गेटत वेळेपूर्वी पूर्ण केलं आहे. सरकार आणि इथेनॉल इंडस्ट्रीच्या संयुक्त प्रयत्नांमुळं हे शक्य झालं आहे. आता AIDA पेट्रोलमधील इथेनॉलची टक्केवारी २० टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. यामुळं आयात करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलामध्ये घट होईल. त्यामुळं भारताला परकीय चलन जास्त खर्च करावं लागणार नाही. याच अर्थव्यवस्थेला देखील फायदा होईल.
AIDA ने मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या युद्धामुळं कच्च्या तेलाच्या किंमतीत उसळी येऊ शकते. याचा थेट परिणाम हा भारतासारख्या आयात प्रधान देशावर पडू शकतो. आपली कच्च तेल आयात करण्याचे प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थितीत इथेनॉल सारख्या देशांतर्गत आणि चांगल्या फ्युअल ऑप्शनवर जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. इथेनॉल हे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एका सुरक्षा कवचासारखं काम करू शकतं.