

Ahmedabad Plane Crash 19 October 1988
अहमदाबाद : अहमदाबादमध्ये गुरुवारी (12 जून 2025) एअर इंडियाचे विमान कोसळले असून अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानात 242 जण होते. भारताच्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातील हा काळा दिवस ठरणार आहे. अहमदाबादमध्ये विमान कोसळल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी 19 ऑक्टोबर 1988 रोजी अहमदाबादमध्ये विमान कोसळले होते. तर त्याच दिवशी गुवाहाटीजवळील डोंगराळ भागात वायुदूत विमानसेवेचे विमान मुसळधार पावसामुळे कोसळले होते. एकाच दिवशी झालेल्या या दोन विमान अपघातांमुळे देश हादरला होता. या दोन्ही विमान अपघातात एकूण 164 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
19 ऑक्टोबर 1988 रोजी काय घडलं होतं?
मुंबई-अहमदाबाद-नवी दिल्ली या मार्गावरील इंडियन एअरलाईन्सचे बोईंग 737 हे विमान अहमदाबाद येथे उतरण्याआधी केवळ एकच मिनिट कोसळले. या दुर्घटनेत १३० लोक ठार झाले.
मुंबईहून पहाटे पावणेपाच वाजता सुटलेले हे विमान तासाभरात अहमदाबादला पोचणार होते. विमान उतरण्याच्या काही काळ आधी एका झाडावर आदळले आणि नंतर उच्च दाबाच्या विद्युततारांवर त्याने धडक दिली होती.
अहमदाबादजवळील चिलोदा कोतारपूर येथील औद्योगिक वसाहतीजवळ हा अपघात झाला होता. लोकवस्तीपासून अगदी थोड्याच अंतरावर ते कोसळले. सुदैवाने लोकवस्तीवर कोसळले नव्हते.
अहमदाबादमधील अपघातात फक्त दोन जण वाचले होते
अहमदाबादमधील 1988 च्या विमान अपघातात पाच प्रवासी जखमी झाले होते. यात 12 वर्षांच्या मुलाचाही समावेश होता. यातल्या विनोदभाई त्रिपाठी आणि अशोक अग्रवाल हे दोन प्रवासी वाचले होते. इतर प्रवासांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत 129 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर होते.
याच दिवशी गुवाहाटीजवळही विमान कोसळले होते. गुवाहाटीपासून आठ किलोमीटर अंतरावर राणी टेकडी परिसरात वायुदूत विमानसेवेचे फॉकर फ्रेंडशिप जातीचे विमान डोंगराळ भागात कोसळले होते. सुरुवातीला विमान बेपत्ता असल्याचा संदेश होता. अनेक तासांच्या शोधमोहिमेनंतर विमानाचे अवशेष सापडले होते. या विमान अपघातात 34 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
कनिष्कनंतरची मोठी दुर्घटना
२३ जून १९८५ रोजी एअर इंडियाचे जंबो जेट कनिष्क विमान अटलांटिक महासागरावर घातपाताने स्फोट होऊन कोसळले होते. त्या अपघातात ३२९ लोक ठार झाले होते. या दुर्घटनेनंतरची 19 ऑक्टोबर 1988 रोजी झालेल्या अपघातात मृतांचा आकडा सर्वाधिक होता.