

UP Crime News
उत्तर प्रदेशात जमीन आणि सोने हडप करण्यासाठी खोटे लग्न रचून एका व्यक्तीची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील कुशीनगर पोलिसांनी नुकतीच मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीच्या खून प्रकरणी एका महिलेसह तिघांना अटक केली. सदर व्यक्तीचा मृतदेह ६ जून रोजी हाटा परिसरातील एका झुडपात आढळून आला होता. त्याच्या मृतदेहावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या अनेक जखमा दिसून आल्या होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिबा बानो, तिचा मित्र कौशल कुमार आणि त्यांचा सहकारी असलेला चालक समसुद्दीन अन्सारी अशी तिघा संशयितांची नावे आहेत. तिघेही २० वर्षे वयाचे आहेत. तिघांनी जबलपूर येथील रहिवासी इंदर देव तिवारी याला उत्तर प्रदेशला बोलावून घेतले. तिथे त्यांनी त्याचे खोटे लग्न रचले आणि त्यानंतर त्याची हत्या केली. त्याची संपत्ती हडपणे, हेच या कृत्यामागील कारण होते.
हे सर्व एका व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर घडले. इंदर देव तिवारी याने प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य यांच्या आध्यात्मिक प्रवचनादरम्यान त्यांची किती संपत्ती? याची सर्व माहिती सांगितली. पण लग्न झाले नसल्याने आपल्याला एकटेपणा जाणवत असल्याचे तो म्हणाला होता. या व्हिडिओची रील व्हायरल झाली. ही रील पाहून २० वर्षीय साहिबाने इंदर सोबत खोटे लग्न रचून त्याची संपत्ती हडप करण्याचा डाव रचला. या कटाचा एक भाग म्हणून, कौशल कुमार १६ मे रोजी जबलपूरला गेला. तिथे तो इंदरला भेटला आणि त्याने स्वतःची ओळख संदीप तिवारी या नावाने करून दिली. त्याने फोनवरून त्याची ओळख साहिबाशी करून दिली. ती त्याची बहीण खुशी असल्याचे त्याने इंदरला सांगितले," असे कुशीनगरचे पोलिस अधीक्षक संतोष कुमार मिश्रा यांनी सांगितले.
साहिबा बानो हिने खुशी असल्याचे भासवून पुढे काही दिवस इंदरशी फोनवर बोलणे सुरु केले. यातच इंदर फसला. काही दिवसांनी तिने इंदरला गोरखपूरला येण्यासाठी सांगितले आणि तो त्यासाठी तयारही झाला. तिने इंदरला त्याच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी अधिक दिलेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी इंदर एकटाच गोरखपूरला पोहोचला. कौशल त्याला साहिबा राहिलेल्या भाड्याच्या खोलीत घेऊन गेला. तिथे ते तिघे एकत्र राहिले. इंदरलाही एक जोडीदार हवा होता. पण तिघांची नजर त्याच्या संपत्तीवर होती. त्यांच्या कटाचा एक भाग म्हणून, साहिबा आणि कौशलने इंदरला एका कागदपत्रावर स्वाक्षरी करायला लावली. त्यात नमूद केले होते की त्याच्या मृत्यूनंतर साहिबा (खुशी) आणि कौशल (संदीप) यांना त्याची मालमत्ता मिळेल. ५ जून रोजी तिघेही इंदरला कारमधून कुशीनगरमधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी साहिबाशी त्याचे खोटे लग्न लावून दिले. यानंतर, आरोपींनी इंदरच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. यामुळे तो बेशुद्ध पडला. तिघेही त्याला कुशीनगरच्या हाटा परिसरात घेऊन गेले. तिथे त्यांनी त्याच्यावर चाकूने वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचा खून केल्यानंतर, त्यांनी त्याचा मृतदेह जवळच्या झुडुपात फेकून दिला. इंदरने लग्नासाठी सोबत आणलेले दागिने आणि रोख रक्कम घेऊन तिघांनीही तेथून पलायन केले," असे पोलिस अधीक्षक संतोष कुमार मिश्रा म्हणाले.
''तिघांच्या अटकेनंतरच्या चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी सांगितले की, इंदर तिवारीचा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याची संपत्ती हडप करण्याचा कट रचला होता. तो लग्न न झाल्यामुळे दुःखी असल्याचे व्हिडिओत म्हणाला होता. त्याच्याकडे १८ एकर जमीन असल्याचे त्याने सांगितले होते," असे मिश्रा यांनी पुढे सांगितले.
पोलिसांना ६ जून रोजी एक बेवारस अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्यानंतरच्या सखोल चौकशीनंतर पोलिसांनी साहिबा, कौशल आणि अन्सारी या तिघांना अटक केली. सुरुवातीला, मृतदेहाची ओळख पटली नव्हती. यामुळे कुशीनगर पोलिसांनी त्याचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला होता.
दरम्यान, मध्य प्रदेशातील इंदरच्या कुटुंबियांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. इंदरने त्याच्या भावाला, तो एका महिलेशी लग्न करण्यासाठी गोरखपूरला जात असल्याचे सांगितले होते. कुशीनगरमध्ये सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची माहिती घेण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांनी संपर्क साधला. त्यानंतर कुशीनगरहून पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशला चौकशीसाठी आले. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यात आली.
या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान, कुशीनगर पोलिसांनी इंदरच्या मोबाईल फोनमधील कॉल रेकॉर्ड तपासले. यातून तो सतत कोणाच्या संपर्कात होता, याची माहिती समोर आली. याद्वारे पोलिसांनी साहिबाचा शोध घेतला. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे, इतर दोन आरोपींनाही अटक केली. पोलिसांनी आरोपींनी खुनाच्या घटनेवेळी वापरलेली कार, मयत व्यक्तीचा मोबाईल फोन, आधार कार्ड, एटीएम कार्ड, जमिनीची कागदपत्रे आणि लग्नासाठी आणलेले दागिने जप्त केले.