नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : सध्याच्या अस्थिर वातावरणात कधी काय होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे देशाच्या सीमांवरील पायाभूत सुविधा मजबूत करणे अत्यंत आवश्यक ठरले असल्याचे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh) यांनी आज (दि.२८) मंगळवारी केले.
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या वतीने (बीआरओ) हाती घेण्यात आलेल्या 27 रस्ते व पुलांच्या बांधणीच्या कामाची सुरुवात सिंग यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
उत्तर सीमांवर पायाभूत सुविधा मजबूत नसेल तर भारत शत्रुला सडेतोड उत्तर देऊ शकणार नाही, असे सांगून सिंग पुढे म्हणाले की, येत्या काही काळात जे रस्ते उभारले जाणार आहेत, त्यात दक्षिण लडाखमधील 19 हजार फूट उंचीवरील उमलिंग-ला पास रस्त्याचा समावेश आहे.
सध्याचे अस्थिर वातावरण पाहिले तर कधी काय होईल, याचा नेम नाही. त्यामुळे सीमाभागाचा विकास गरजेचा बनला आहे. सीमाभागातील पायाभूत सुविधांच्या विकासात बीआरओने बजावलेली भूमिका मोलाची आहे.
सीमाभागात बनत असलेले रस्ते व पूल केवळ देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत असे नाही तर दुर्गम भागाच्या विकासासाठी हा विकास काळाची गरज आहे.