नागपूर, पुढारी ऑनलाईन : केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी तीन कृषी कायद्यांसंदर्भात पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या दृष्टीने संकेतात्मक वक्तव्य केलं होतं. त्यावर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी ट्विट करून पुन्हा शेतकरी आंदोलन छेडण्याची धमकी देत म्हणाले की, "पंतप्रधांनांची जागतिक पातळीवरील प्रतिमा खराब व्हावी किंवा त्यांनी माफी मागावी", अशी आमची इच्छा नाही. (Tikait Vs Tomar)
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर एका कार्यक्रमात म्हणाले होते की, "आम्ही कृषी कायदे आणलेले होते. काही लोकांना ते पसंत पडले नाहीत. पण, सरकार निराश नाही. आम्ही एक पाऊल मागे आलो; पण पुन्हा पुढे जाणार आहोत. कारण, भारताचा कणा ठीक झाला तरच भारत मजबूत होईल." या वक्तव्यावर राकेश टिकैत यांनी जशास तसे उत्तर देत स्पष्ट विरोध केला.
राकेश टिकैत म्हणाले की, "पंतप्रधानांना माफी मागावी किंवा जागतिक पातळीवर त्यांची प्रतिमा खराब व्हावी, अशी आमची इच्छा नाही. जर कोणताही निर्णय धेतला जाणार असेल तर शेतकऱ्यांच्या मर्जीच्या विरोधात कोणताही निर्णय होणार नाही. आम्ही प्रामाणिकपणे शेतात नांगर चालविला. पण, दिल्लीतल्या लोकांनी शेतमालाला भाव देण्यात अप्रामाणिकपणा दाखविला", अशी खरमरीत टीका त्यांनी केली. (Tikait Vs Tomar)
नरेंद्र सिंह तोमर यांनी मात्र या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे की, "केंद्रीय कृषी कायदे पुन्हा आणण्याची कोणतीच योजना नाही. माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं आहे." यावर राकेश टिकैत यांनी थेट धमकी दिली आहे की, "केंद्रीय कृषी कायद पुन्हा आणण्याचा प्रयत्न झाला तर पुन्हा शेतकरी आंदोलन छेडण्यात येईल." १९ नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे रद्द केल्याचे जाहीर केलेले होते. त्यानंतर वर्षभर सुरू असलेले शेतकरी आंदोलन मागे घेण्यात आले.
पहा व्हिडीओ : भारतीय लष्कराने घडवलेल्या ऐतिहासिक विजयाला 50 वर्षे पूर्ण