थंडीत घट, महाराष्ट्रातील सर्वच भागांत तीन दिवस पावसाची शक्यता | पुढारी

थंडीत घट, महाराष्ट्रातील सर्वच भागांत तीन दिवस पावसाची शक्यता

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राजस्थान ते विदर्भ या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील सर्वच भागांत तीन दिवस पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील किमान तापमानात दीड ते दोन अंशांनी वाढ झाल्याने थंडीत घट झाली आहे.

राज्यात 28 ते 30 डिसेंबर या काळात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. याची तीन कारणे आहेत. दक्षिण-पश्‍चिम राजस्थान ते विदर्भ भागावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तिकडून थेट विदर्भात पाऊस
येण्याची शक्यता आहे. हा पाऊस विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा होणार असल्याचा अंदाज आहे.

पूर्व अफगाणिस्तान व पाकिस्तानात पश्‍चिम भागात चक्रवात सक्रिय झाला आहे. तसेच राजस्थान व बिहारमध्ये वार्‍यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने देशातील 26 राज्यांत आगामी तीन दिवस पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतात दाट धुक्यासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.

रविवारचे राज्याचे किमान तापमान

जळगाव 11.7, वर्धा 14, नागपूर 13.4, गोंदिया 12.5, चंद्रपूर 15, बुलडाणा 14.2, अमरावती 14.7, अकोला 14.6, नांदेड 15.2, परभणी 14.5, औरंगाबाद 12.4, सोलापूर 14, सातारा 14, सांगली 14.5, कोल्हापूर 16, नाशिक 11.7, महाबळेश्‍वर 13.5, पुणे 12.9, मुंबई 21.6.

Back to top button