महाराष्ट्रातील कन्नड लोकांचे रक्षण ही आमची जबाबदारी : बसवराज बोम्मई | पुढारी

महाराष्ट्रातील कन्नड लोकांचे रक्षण ही आमची जबाबदारी : बसवराज बोम्मई

बंगळूर, पुढारी ऑनलाईन :  बेळगावातही मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला असून महाराष्ट्रात उमटलेल्या प्रतिक्रियांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कन्नड लोकांचे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे, असे सांगत आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले. तसेच दोन्ही राज्यांचे पोलिस महासंचालक चर्चा करणार आहेत.

बंगळूर येथील सदाशिवनगरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सीमाभाग आणि महाराष्ट्रात उमटले आहेत.

बंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्याचे पडसाद बेळगावात उमटले. या घटनेची प्रतिक्रिया म्हणून क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. हिंसक जमावाने पोलिसांच्या गाड्या तसेच इतर सरकारी वाहनांनाची तोडफोड केली. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील सांगली शहर, मिरज, जत, इस्लामपूर, विटा येथे व पुणे शहरात कर्नाटक राज्य परिवहन सेवेच्या बसेस तसेच खासगी वाहनांची तोडफोड केली. कोल्हापुरात कर्नाटकी व्यावसायिकांच्या दुकानांवर दगडफेक केली. या घटनेची दखल घेत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नाराजी व्यक्त केली.

‘महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना होणे गंभीर बाब आहे. यातील दोषींना आम्ही सोडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली. त्या दोन्ही प्रकरणांत आतापर्यंत ३० जणांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचाही शोध घेतला जात आहे. मात्र, त्याचवेळी दोन्ही बाजूने संयम दाखवण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र सरकारने हिंसक घटनांना कुणीही प्रोत्साहन देऊ नये, असे बोम्मई म्हणाले.

याबाबत कर्नाटकचे पोलीस महासंचालक महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांशी बोलणार आहेत. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि आमचे गृहमंत्री महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांशी बोलणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जशी आमची जबादारी आहे, तशीच महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड नागरिकांचे रक्षण ही आमची जबाबदारी आहे. शिवसेना नेते सजय राऊत यांनी ‘उठ मराठ्या उठ’ अशी हाक दिल्याने बोम्मई यांनी नाराजी व्यक्त केली. अशी वक्तव्ये टाळायला हवीत असे ते म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button