पुढारी ऑनलाईन डेस्क : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) विधानसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पर्यायी विरोधी आघाडीत सामील होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी जोरदार तयारीत असलेले अखिलेश यादव म्हणाले की, बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींनी जशी भाजपला धुळ चारली तशी उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी पक्षाचा विनाश होईल.
यादव यांनी बुंदेलखंडमधील झाशी येथे माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले बंगालमध्ये भाजपचा सुफडासाफ करणाऱ्या ममता बॅनर्जी यांचे मी स्वागत करतो. ज्या प्रकारे त्यांनी बंगालमध्ये भाजपला पराभूत केले. तसेच उत्तर प्रदेशातील जनताही त्याच प्रकारे भाजपला पराभूत करेल. ममता बॅनर्जी यांच्यासोबत आघाडी करणार का याबाबत विचारल्यास ते म्हणाले, योग्य वेळ आल्यावर त्याबाबत बोलू. काँग्रेसला युपीची जनता मतदान करणार नाही आगामी निवडणुकीत त्यांना एकही जागा मिळणार नाही.
केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाने लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना त्यांच्या गाडीखाली तुडवले तेव्हा यादव कुठे गायब होते., असा सवाल मुरादाबाद येथील सभेत काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी अखिलेश यादव यांना केला हाेता.
यावर अखिलेश यांनी मागच्या निवडणुकीवेळी आम्हाला काँग्रेसमुळे मोठा फटका बसला. काँग्रेससोबत गेल्याचा आमचा अनुभव अजिबात चांगला नसल्याचेही अखिलेश म्हणाले.
झाशीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या पूर्वांचल एक्स्प्रेस वेवरूनही यादव यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांच्या पक्षाने सुरू केलेल्या प्रकल्पांचे श्रेय भाजप घेत असल्याचा दावा त्यांनी केला. समाजवादी पक्ष २२ महिन्यांत एक्स्प्रेस वे बनवू शकतो, तर भाजपला तेच काम करायला साडेचार वर्षे का लागली? भाजपला यूपीमध्ये लोकांच्या हितासाठी काम करायचे नाही. यामुळेच त्यांनी यासाठी विरोध केला आहे, असेही ते म्हणाले.