Arvind Kejriwal: केजरीवालांचे 'मिशन' लाेकसभा सुरु, 'आप' आमदारांची घेतली बैठक | पुढारी

Arvind Kejriwal: केजरीवालांचे 'मिशन' लाेकसभा सुरु, 'आप' आमदारांची घेतली बैठक

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज (दि.१२) दिल्‍लीत आम आदमी पक्षाच्या (आप) आमदारांची बैठक घेतली. शुक्रवारी अंतरिम जामीन मिळाल्यानंतर ‘आप’च्‍या आमदारांसोबत त्‍यांची ही पहिलीच बैठक हाेती. या बैठकीत त्‍यांनी लाेकसभा निवडणुकीच्‍या रणनीतीवर चर्चा केली.

काय म्‍हणाले केजरीवाल ?

  •  दिल्ली आणि पंजाबमध्ये ‘आप’ सरकारने केलेल्या कामाची जगभरात चर्चा होत आहे.
  •  येणाऱ्या काळात केवळ आम आदमी पार्टीच देशाला भविष्य देऊ शकते.
  • सत्ताधारी भाजप सरकार ना आमचे सरकार पाडू शकले, ना ते आमचे आमदार फोडू शकले

माझ्या अटकेनंतर ‘आप’ आणखी मजबूत झाला

मी तुरुंगात असताना दिल्लीच्या जनतेला औषधे मिळणे बंद होणार नाही ना?, मोफत वीज आणि पाणी कुठेतरी थांबले नाही ना?, अशी भीती वाटत होती; परंतु आपण सर्वांनी खूप चांगले काम केले आणि कोणतेही षड्यंत्र यशस्वी होऊ दिले नाही. मला अटक करून भाजपला पक्ष फोडायचा होता आणि सरकार पाडायचे होते; पण झाले उलटे माझ्या अटकेनंतर पक्ष आणखी मजबूत झाल्‍याचे सांगत त्‍यांनी लाेकसभा निवडणुकीसाठी नव्‍या जाेमाने प्रचार करण्‍याचे आवाहन केले.

Arvind Kejriwal: सत्ताधारी भाजपची पक्षफोडीची योजना अयशस्वी

या बैठकीत बोलताना केजरीवाल म्हणाले, “सत्ताधारी भाजप सरकार ना आमचे सरकार पाडू शकले, ना ते आमचे आमदार फोडू शकले, ना ते आमचे पंजाब सरकार पाडू शकले. त्यांची संपूर्ण योजना अयशस्वी झाली. याउलट संपूर्ण राजकीय परिस्थितीच भाजप सरकारच्या विरोधात गेल्याचे चित्र आहे”.

‘आप’च्‍या आमदारांनी पक्षाला नियंत्रणात ठेवावं : केजरीवाल

मला हे देखील कळले की, सत्ताधारी भाजप सरकारने तुम्हाला आमिष दाखवून तोडण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही सर्वजण खंबीर राहिलात, यासाठी पक्षाचा आणि देशाचाही अभिमान वाटतो. मी 21 दिवसांसाठी तुरुंगातून बाहेर आलो आहे. परत २ जूनला मला तुरुंगात जावं लागणार आहे. त्यामुळे इथून पुढे देखील तुम्ही सर्वांनी पक्षाला नियंत्रणात ठेवावं. कारण देशातील इतर राजकीय पक्षांपेक्षा आम आदमी पक्षच या देशाला भविष्य देऊ शकतो, असा विश्‍वासही केजरीवाल यांनी या बैठकीत व्‍यक्‍त केला.

हेही वाचा:

 

Back to top button