‘पाकिस्‍तानने बांगड्या घातलेल्‍या नाहीत’ : फारुख अब्दुल्लांची वादग्रस्त टिप्पणी | पुढारी

'पाकिस्‍तानने बांगड्या घातलेल्‍या नाहीत' : फारुख अब्दुल्लांची वादग्रस्त टिप्पणी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्मू आणि काश्मीरमधील विकास बघून पाकव्याप्त काश्मीरचे नागरिक आपण होऊनच भारतात येण्यास तयार होतील. भारताला त्यासाठी बळाचा वापर करावा लागणार नाही,, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत व्‍यक्‍त केला होता. या विधानावर टीका कराताना जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी वादग्रस्‍त विधान केले. ( Farooq Abdullah’s Controversial Comment )

त्‍यांच्‍याकडे अणुबॉम्‍ब आहेत…

राजनाथ सिंह यांच्‍या विधानावर टीका करताना फारुख अब्दुल्ला म्‍हणाले की, पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत आणि त्यांच्याकडे अणुबॉम्ब देखील आहेत जे आमच्यावर पडतील. ( Farooq Abdullah’s Controversial Comment )

इंडिया आघाडीच्‍या नेत्‍यांवर पाकिस्‍तानची छाप : भाजपची टीका

आत्तापर्यंत पाकिस्तानातील काही दहशतवादी संघटनांच्‍या म्‍होरक्‍यांनी कधी-कधी त्यांच्याकडे अणुबॉम्ब असल्याचे म्हटले होते; पण आज इंडिया आघाडीचे ज्‍येष्‍ठ नेते फारुख अब्दुल्ला यांनीही असेच म्हटले आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांवर पाकिस्तानची छाप आहे, अशी टीका भाजपचे खासदार आणि पक्षाचे प्रवक्‍ते सुधांशू त्रिवेदी यांनी केली आहे.

सुधांशू त्रिवेदी यांनी म्‍हटले आहे की, पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी म्‍हणतात की, भारतातून भाजप आणि मोदींची सचत्ता जावी. तर पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांचे पूंछवरील विधान पाकिस्तानच्या गैरकृत्ये लपविण्याचा प्रयत्न करतात.शशी थरूर यांनी एका बांगलादेशी दैनिकात लेख लिहिला आहे. यामध्‍ये नरेंद्र मोदी यांना सत्तेतून पायउतार व्‍हावे लागले असे म्‍हणले आहे. त्यांनी काश्मीरचा उल्लेख भारतीय प्रशासित काश्मीर असा केला. आता इंडिया आघाडीचे ज्‍येष्‍ठ नेते फारुख अब्दुल्ला यांनीही पाकिस्‍तानचे अप्रत्‍यक्ष समर्थनच केले आहे. इंडिया आघाडीच्‍या नेत्‍यांची पाकिस्तानची भाषा आहे. पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे इंडिया आघाडीच्‍या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे . तसेच इंडिया आघाडीच्‍या नेत्‍यांवर पाकिस्‍तानची छाप आहे.

काय म्‍हणाले होते संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ?

जम्मू आणि काश्मीरमधील विकास बघून पाकव्याप्त काश्मीरचे नागरिक आपण होऊनच भारतात येण्यास तयार होतील. भारताला त्यासाठी बळाचा वापर करावा लागणार नाही,, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत व्‍यक्‍त केला होता. काश्मीरमधील स्थितीबाबत राजनाथ सिंह म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमधील स्थितीत होत असलेली सुधारणा पाहता एक दिवस तेथे अ‍ॅफस्पा लागू करण्याची गरज राहाणार नाही. अर्थात हे माझे मत असून त्याबाबत गृहमंत्रालयच निर्णय घेईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. ते म्हणाले, पाकिस्तानचा सीमापार दहशतवादामध्ये असलेला सहभाग जगजाहीर आहे. पाकिस्तानने आता या कारवाया बंद करायला हव्यात. या भागात शांतता राहावी आणि दहशतवादाचा बीमोड व्हावा यावर भारताचा निर्धार कायम असल्याचेही ते म्हणाले होते.

हेही वाचा : 

 

 

Back to top button