![इस्रायल- हमास युद्धावर फारुख अब्दुल्लांचे मोठे विधान, “मुस्लिमांकडे सत्ता आहे; पण…”](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F12%2FFARUKHA-ABDULLA.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास (Israel and Hamas war) यांच्यातील युद्धाला आता दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने जोरदार प्रत्युत्तर देत गाझा शहरावरील हवाई हल्ले सुरुच ठेवले आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल काॅन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी या युद्धाबाबत मोठे विधान केले आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धावर भाष्य करताना फारुख अब्दुल्ला म्हणाले की, "मुस्लिमांकडे अनेक देशातील सत्ता आहे, पण मुस्लिम देशांमध्ये ऐक्य नाही. काळ बदलत आहे; पण समस्या अशी आहे की, याला जबाबदार कोण? इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्ध थांबलेले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन स्वतः तिथे गेले, पण त्यानंतरही युद्ध थांबलेले नाही. याबाबत मला अमेरिकेची नाही, तर मुस्लिम देशांची खंत आहे. कारण मुस्लिम देशांमध्ये ऐक्य नाही."
मुस्लीम देशांमध्ये ताकद आहे, पण एकता नाही. आपण एकत्र आलो तर सर्व समस्या संपतील. जरा आपल्या देशाकडे बघा. आम्ही पीडित पक्षाच्या पाठीशी उभे राहू, असे महात्मा गांधी म्हणाले होते; पण आज काय परिस्थिती आहे? खरंच आपण त्यांच्यासोबत आहोत का? मी मुस्लिम बहुल प्रदेश असलेल्या काश्मीरमधून आलो आहे, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.
फारुख अब्दुल्ला पुढे म्हणाले की, 'आम्हाला पॅलेस्टाईनच्या बाजूने निदर्शने करायची होती; पण परवानगी मिळाली नाही. आम्ही कुलूपबंद होतो. त्यावर टीका होत असताना पंतप्रधान मोदींनी जहाजातून पॅलेस्टाईनला मदत पाठवली. आपलीच घरे जळत असताना आपण इतरांना कसे वाचवणार? आपल्याच भावा-बहिणींची हत्या होत असताना मी इतरांना कसे वाचवू शकतो?, असा सवालही त्यांनी केला होता.
सोमवार दि. ११ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने जम्मू-काश्मीर राज्याला विशेषाधिकार बहाल करणारे कलम ३७० रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायम ठेवला होता. या निर्णयानंतर माध्यमांशी बोलताना फारुख अब्दुल्ला म्हणाले होते की, जम्मू-काश्मीर नरकात जावे आणि मी काय बोलू? केंद्र सरकारने स्वत:चे राज्य तिथे नेले आहे. तुम्हाला लोकांची मने जिंकायची आहेत. लोकांना दूर ढकलणाऱ्या गोष्टी केल्या तर तुमची मने कशी जिंकता येतील?, असा सवालही त्यांनी केला होता.
हेही वाचा :