पुढारी ऑनलाईन डेस्क: जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होतील, राज्याचा दर्जाही दिला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यानच्या सभेत स्पष्ट केले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथील प्रचार सभेत ते आज (दि.१२) बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे, ती वेळ दूर नाही. जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळेल. जम्मू-काश्मीरमध्ये खुली गुंतवणूक होईल आणि येथे विकासाचे नवे आयाम प्रस्थापित होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि.१२) उधमपूर येथील निवडणूक रॅलीला संबोधित करत आहेत. (PM Modi in J&K)
जम्मू-काश्मीर भाजपचे अध्यक्ष रवींद्र रैना यांनी डोगरी पगडी घालून पंतप्रधानांचा सन्मान केला. पीएम मोदींसोबत भाजप प्रदेशाध्यक्ष रणविद्र रैना, उधमपूरचे भाजप उमेदवार डॉ. जितेंद्र सिंह, जम्मूतील भाजपचे उमेदवार जुगल किशोर शर्मा, राज्यसभा खासदार गुलाम अली खटाना आणि अन्य भाजप नेते मंचावर उपस्थित आहेत. (PM Modi in J&K)
अनेक दशकांनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे जेव्हा दहशतवाद, फुटीरतावाद, दगडफेक, बंद, संप, सीमेपलीकडून गोळीबार, हे निवडणुकीचे मुद्दे नाहीत. त्यावेळी माता वैष्णोदेवी यात्रा असो की अमरनाथ यात्रा, ती सुरक्षितपणे कशी पार पडावी, अशी चिंता होती. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये विकास होत आहे आणि विश्वासही वाढत आहे. म्हणूनच आज जम्मू-काश्मीरच्या कानाकोपऱ्यातून पुन्हा एकदा मोदी सरकार हा एकच प्रतिध्वनी ऐकू येत आहे , असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
ही निवडणूक केवळ खासदार निवडण्यासाठी नाही, तर ही निवडणूक देशात मजबूत सरकार स्थापन करण्यासाठी आहे. आणि जेव्हा सरकार मजबूत असते, तेव्हा ते जमिनीवरील आव्हानांमध्येही काम करते, आव्हानांना तोंड देते. विकसित भारतासाठी विकसित जम्मू-काश्मीरच्या निर्मितीची हमी मोदी देत आहेत. पण काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीला जम्मू-काश्मीरला त्या जुन्या दिवसांत घेऊन जायचे आहे. या घराणेशाहीने चालवलेल्या पक्षांनी जम्मू-काश्मीरचे जेवढे नुकसान केले तेवढे कोणीही केले नाही. या राजकीय पक्षांचा अर्थ केवळ कुटुंबातील, कुटुंबाने आणि कुटुंबासाठी इतकाच आहे, असे म्हणत पीएम मोदींनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा: