पुढारी ऑनलाईन डेस्क: देरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यात भीषण अपघात घडला. यामध्ये ६ शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत. आज (दि.११) ईदनिमित्त देशभरात सार्वजनिक सुट्टी असताना देखील शाळा प्रशासनाकडून नियम डावलून वर्ग सुरू ठेवण्यात आले होते. परंतु शाळेत पोहचण्यापूर्वीच या ६ विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. या अपघातामागील धक्कादायक कारण समोर आले आहे. (Haryana Accident)
भीषण अपघातातील एका जखमी विद्यार्थ्याने 'एएनआय'ला सांगितले की, विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या या खासगी बसचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. बसचा वेगही १२० इतका होता. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले, असे विद्यार्थ्याने म्हटले आहे. या संदर्भातील व्हिडिओ 'एएनआय'ने शेअर केला आहे. (Haryana Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, या स्कूल बसची कागदपत्रेही पूर्ण नाहीत. बसचे फिटनेस प्रमाणपत्र देखील कालबाह्य झाल्याचे दिसत आहे. त्यानंतरही शाळा प्रशासन ही बस चालवत होते. त्यामुळे देखील हा भीषण अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Haryana Accident)
स्कूल बस अपघाताची माहिती मिळताच, एक पालक आपल्या मुलीला पाहण्यासाठी घटनास्थळी पोहोचले असता तेही अपघाताचे बळी ठरले आहे. या अपघातात मुलीच्या आईचा पाय मोडला आहे. तर त्यांच्या मुलीचा स्कूल बस अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.