

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या वतीने आज (दि. ३१) महासभा झाली. या वेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी 'इंडिया' आघाडीच्या वतीने विरोधी पक्षांच्या पाच मागण्या मांडल्या.
१) हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांची तात्काळ तुरुंगातून सुटका करण्यात यावी
२) भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत सर्वांसाठी समान संधी उपलब्ध करुन द्यावी.
३) निवडणुकांमध्ये हेराफेरी करण्याच्या उद्देशाने केलेल्या विरोधाविरुद्ध आयकर, सीबीआय आणि ईडीची सक्तीची कारवाई निवडणूक आयोगाने थांबवावी.
४) विरोधी पक्षांची आर्थिक गळचेपी करण्याचे प्रयत्न थांबवले पाहिजेत
५) निवडणूक रोखे (इलेक्टोरल बॉण्ड्स) माध्यमातून भाजपने केलेल्या निधीच्या उधळपट्टीची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करावी.
यावेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या की, "प्रभू राम जेव्हा सत्यासाठी लढत होते तेव्हा त्यांच्याकडे संसाधने नव्हती. त्यांच्याकडे रथ देखील नव्हता. रावणाकडे रथ, संसाधने, सैन्य आणि सोने होते. तर प्रभू राम यांच्याकडे सत्य, आशा, विश्वास, विनय, संयम आणि धैर्य होते. प्रभू रामाच्या जीवनातील संदेश हा आहे की सत्ता शाश्वत नसते आणि अहंकार नष्ट होतो."
या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, भाजपने अन्य पक्षांच्या नेत्यांना धमकावून आणि आमदार-खासदार विकत घेऊन सरकार स्थापन केले. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आम्हाला लढावे लागेल," यावेळी
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राहुल गांधी, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, जम्मू-काश्मीर एनसी नेते फारुख अब्दुल्ला, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती, झारखंडच्या मुख्यमंत्री चंपाई सोरेन,पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह इंडिया आघाडीतील नेते उपस्थित होते.
हेही वाचा :