Himachal Political Crisis : हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे ६ बंडखोर आमदार अपात्र | पुढारी

Himachal Political Crisis : हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे ६ बंडखोर आमदार अपात्र

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राज्‍यसभा निवडणुकीवेळी क्रॉस व्होटिंग केलेल्‍या काँग्रेसच्‍या सहा आमदारांवर पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत  कारवाई ओढावून घेतली आहे, असे स्‍पष्‍ट करत विधानसभा अध्‍यक्ष कुलदीप सिग पठानिया यांनी आज ( दि. २९ फेंब्रुवारी) ६ बंडखाेर आमदारांना अपात्र ठरवले आहे. काँग्रेस आमदार आणि संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन चौहान यांनी पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत बंडखाेर सहा आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली होती. या सहा आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे हिमाचल प्रदेशच्‍या राज्यसभेच्या जागेवर  काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा भाजपच्या हर्ष महाजन यांनी पराभव केला होता. (Himachal Political Crisis )

विधानसभा अध्‍यक्ष कुलदीप सिंग पठानिया यांनी बुधवारी ( दि.२८ फेब्रुवारी) दोन्‍ही बाजू ऐकून घेतल्‍या. व्हीप जारी असतानाही भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करणे. याशिवाय अर्थसंकल्प मंजूर करताना सभागृहात अनुपस्थित राहिल्‍याचे आरोप काँग्रेस आमदार राजेंद्र राणा, सुधीर शर्मा, रवी ठाकूर, देवेंद्र कुमार भुट्टो, इंद्रदत्त लखनपाल आणि चैतन्य शर्मा यांच्यावर होता. विधानसभा अध्‍यक्ष कुलदीप सिग पठानिया यांनी आज ( दि. २९ फेंब्रुवारी) या बंडखाेर  आमदारांना पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरवले. (Himachal Political Crisis )

माध्यमांशी बोलताना हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्‍यक्ष कुलदीप सिंह पठानिया म्हणाले की, काँग्रेसच्‍या ६ बंडखोर आमदारांविरोधात पक्षांतरविरोधी कायद्याविरोधात संसदीय मंत्र्यांची याचिका दाखल झाली होती. सर्व बंडखोर आमदारांना आपलं मत मांडण्‍याची संधी देण्‍यात आली. बुधवार, २८ फेब्रुवारीला रात्री नऊ वाजेपर्यंत सुनावणी चालू शकली असती, मात्र सहा वाजेपर्यंत सुनावणी होऊन रेकॉर्ड सादर करण्यात आले, असे विरोधी वकिलांना सांगितले. अधिवक्ता सतपाल जैन यांनी वेळ मागितली होती.

कुलदीप सिंह पठानिया म्हणाले की, काँग्रेस विधीमंडळ पक्षासाठी जारी करण्यात आलेल्या व्हिपवर या सर्व आमदारांच्या सह्या आहेत. अशा परिस्थितीत वेळ देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते म्हणाले की, मंगळवारी सभागृह तहकूब झाले तेव्हाही आमदार सभागृहात येऊन बसले, परंतु कामकाज सुरू असताना ते उपस्थित नव्हते. . हे सर्व आमदार पक्षविरोधी कायद्यांतर्गत दोषी आढळले.

व्हिपचे उल्लंघन केल्यामुळेच आमदार ठरले अपात्र

पठानिया यांनी सांगितले की, पक्षांतर विरोधी कायदा आमदारांनी पक्ष बदलू नये म्हणून करण्यात आला आहे.हे आमदार काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकले आणि जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला. अशा स्थितीत पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन करून त्यांनी आता पक्षांतरविरोधी कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्‍यामुळे त्‍यांचे सदस्यत्व रद्द करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

राज्‍यसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडी वेगावल्‍या

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसल्यानंतर हिमाचल प्रदेशात राजकीय घडामोडी वेगावल्‍या. काँग्रेस नेते वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी आमदारांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि त्यांचे वडील आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिवंगत वीरभद्र सिंह यांचा अनादर केल्याचा आरोप करत राज्यमंत्री विक्रमादित्य सिंह आज सकाळी मंत्रीपदावरून पायउतार झाले. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घोषणाबाजी आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह १५ आमदारांना निलंबित केले. दिवसभरातील वेगवान राजकीय घडामोडीनंतर बुधवारी रात्री विक्रमादित्य सिंह यांनी आपला राजीनामा मागे घेतला. यानंतर हिमाचल प्रदेशमधील राजकीय नाट्यावर पडदा पडला.

Himachal Political Crisis :राज्‍यसभा निवडणुकीत भाजपने मारली बाजी

हिमाचलमधील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी भाजपच्या हर्ष महाजन यांनी काँग्रेसच्या अभिषेक मनू सिंघवी यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. यावरून काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. यानंतर काँग्रेसचे ६ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे कळते.

काँग्रेसचे ६ आमदार आणि ३ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने भाजप उमेदवाराचा विजय झाला. यामुळे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू सरकार अस्थिर झाल्याची चर्चा सुरु झाली. तसेच सुक्‍खू यांनी मुख्‍यमंत्री पदाचा राजीनामा देण्‍याचा प्रस्‍ताव पक्षश्रेष्‍ठींकडे दिला असल्‍याचे वृत्तही समोर आले. मात्र काही वेळातच सुक्‍खू यांनी आपण राजीनामा दिला नसल्‍याचा खुलास केला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेते भूपिंदर सिंह हुडा आणि डीके शिवकुमार यांना नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी पाठवले. (Rajya Sabha Election 2024)

Himachal Political Crisis : भाजपच्या १५ आमदारांचे निलंबन

विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घोषणाबाजी आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह विपिन सिंह परमार, रणधीर शर्मा, लोकेंद्र कुमार, विनोद कुमार, हंस राज, जनक राज, बलबीर वर्मा, त्रिलोक जामवाल, सुरेंद्र शोरी, दीप राज, पूरण ठाकूर, इंदर सिंह गांधी, दिलीप ठाकूर आदी १५ भाजप आमदारांवर आज विधानसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली. यामुळे सभागृहाचे कामकाज काहीवेळ तहकूब करण्यात आले. हिमाचल प्रदेशमधील ६८ सदस्यीय सभागृहात काँग्रेसचे ४०, भाजपचे २५ आणि तीन अपक्ष आमदार आहेत.

हेही वाचा : 

 

 

Back to top button