भ्रष्टाचारमुक्त विकासाची गाथा सर्वसामान्यांपर्यंत पोचवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

भ्रष्टाचारमुक्त विकासाची गाथा सर्वसामान्यांपर्यंत पोचवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भ्रष्टाचारमुक्त विकासाची यशोगाथा सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोचवावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पक्ष कार्यकर्त्यांना उद्देशून केले. प्रत्येक बूथवर मागील वेळी मिळालेल्या मतांपेक्षा 370 वाढीव मते मिळवावीत. विरोधक चिखलफेकीचे राजकारण करतील. मात्र भाजपने विकासाचाच प्रचार करावा, अशा सूचनाही केल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाला आज राजधानी दिल्लीमध्ये प्रारंभ झाला. या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केले आणि निवडणुकीतील विजयाचा आराखडा मांडला. पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी पदाधिकारी बैठकीची माहिती देताना पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाचा तपशील सांगितला. विरोधी पक्ष या निवडणुकीत चिखलफेकीचे राजकारण करतील, अनावश्यक भावनिक मुद्दे समोर आणतील. परंतु विकासाच्या मुद्द्यावर, गरीब कल्याणाच्या कामावरच केंद्रित प्रचार घेऊन मतदारांपर्यंत जावे, अशीही सूचना पंतप्रधानांनी केल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले. तत्पूर्वी, भारत मंडपम परिसरात अधिवेशनस्थळी सर्व राष्ट्रीय पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते भाजपच्या ध्वजारोहणाने अधिवेशनाला औपचारिक सुरुवात झाली. दीपप्रज्वलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदाधिकार्‍यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले.

मुखर्जी यांचे बलिदान

जम्मू-काश्मीरचे 370 कलम रद्द करण्यासाठीच्या आंदोलनात जनसंघाचे नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बलिदान दिले होते. त्याचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदाधिकार्‍यांच्या बैठकीत मार्गदर्शन केल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांनी 370 जागांकडे केवळ आकडा म्हणून पाहू नये तर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींना ही श्रद्धांजली असेल, या ऊर्जेने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. एनडीएच्या जागांपैकी भाजप ज्या जागा लढवणार आहे, त्या जागांवर कमळ हे निवडणूक चिन्हच उमेदवाराचे असेल. औपचारिक उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू राहील. परंतु कार्यकर्त्यांनी कमळाच्या विजयासाठी पुढील 100 दिवसांत कंबर कसून कामाला लागावे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.

प्रत्येक बूथवर पूर्वीपेक्षा 370 मे अधिक मिळवा

याअंतर्गत केंद्राच्या आणि भाजपशासित राज्यांच्या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी संपर्क मोहीम 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. भाजप कार्यकर्त्यांनी पुढील 100 दिवस थेट बूथवर काम करावे. मागील निवडणुकीत त्या बूथवर मिळालेल्या मतांपेक्षा 370 अधिक मते कशी मिळतील याचे नियोजन करावे. त्यासाठी पहिल्यांदा मतदान करणार्‍या तरुण मतदारांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचावे. तसेच मागील दहा वर्षांत केलेल्या कामाच्या आधारे माता-भगिनींचा आशीर्वाद मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियता दाखवावी, अशी सूचना पंतप्रधान मोदींनी केली. मागील दहा वर्षांतील सरकारचा कार्यकाळ आणि घटनात्मक पदांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पूर्ण झालेली 23 वर्षे या संपूर्ण कालावधीमध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. विकासाची ही आरोपमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त विकासाची यशोगाथा सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवावी, असाही आग्रह पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना केला.

Back to top button