Kiren Rijiju: काँग्रेस सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार कॅंसरसारखा पसरवला : किरेण रिजेजु | पुढारी

Kiren Rijiju: काँग्रेस सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार कॅंसरसारखा पसरवला : किरेण रिजेजु

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  देशात काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भ्रष्टाचार कॅंसरसारखा पसरवला आहे. काँग्रेसचे नावच भ्रष्टाचारी पक्ष असायला पाहिजे. लुटा आणि लुटू द्या हेच काँग्रेसचे धोरण होते. काँग्रेसच्या काळात चांगले देशात चांगले काम होत होते असे केवळ भ्रष्टाचारी लोकांनाच वाटते. असा जोरदार हल्लाबोल भाजपच्या वतीने काँग्रेससह इंडिया आघाडीवर करण्यात आला. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री किरेण रिजेजु यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत कॉंग्रेसला चांगलेच धारेवर धरले. Kiren Rijiju

पुढे बोलताना ते म्हणाले की, जिथे जिथे भाजप सरकार बनेल तिथे भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २ महत्वाच्या गॅरंटी दिल्या आहेत. पहिली गॅरंटी म्हणजे भारताला विकसित राष्ट्र बनवणे, पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणे, प्रत्येक योजना गरिबांपर्यंत पोहोचवणे ही आहे. तर दुसरी गॅरंटी प्रत्येक भ्रष्ट्राचारी व्यक्तीवर कारवाई करणे ही आहे. तसेच मोदी सरकार भ्रष्टाचाराविरुद्ध कडक कारवाई केली जाते. म्हणूनच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी पंतप्रधान मोदींचा द्वेष करतात, असेही ते म्हणाले. Kiren Rijiju

काँग्रेस खासदार धीरज प्रसाद साहू यांनी नोटबंदीदरम्यान केलेले एक ट्विट यावेळी किरेण रिजेजु यांनी वाचून दाखवले. या ट्विटमध्ये धीरज प्रसाद साहू यांनी देशात भ्रष्टाचार फोफावला असून भ्रष्ट्राचार संपवण्याचे काम केवळ काँग्रेस करू शकते, असे म्हटले आहे. मात्र, अलीकडेच त्यांच्या घरी कोट्यवधी रुपये सापडले होते. याच गोष्टीचा समाचार घेत भ्रष्ट्राचार संपवायचा असेल, तर काँग्रेस आणि काँग्रेस सारख्यांना संपवावे लागेल, तरच भ्रष्टाचार संपू शकेल, असेही ते म्हणाले.

इंडिया आघाडीचा समाचार घेताना ते म्हणाले की, इंडिया आघाडीचे अनेक लोक जामिनावर बाहेर आहेत. काही लोकांना न्यायालय जामीन देखील देत नाही, असे म्हणत त्यांनी आम आदमी पक्षावरही टीका केली. मोदी सरकारमध्ये भ्रष्ट्राचारी लोकांवर कडक कारवाई होत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सहकाऱ्यांनी आता विविध संस्थांवर टीका करायला सुरुवात केली आहे. भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई करावीच लागेल. त्यासाठी सर्व संस्थांना खुली सूट दिली आहे. भ्रष्ट्राचार करणाऱ्यांविरोधात सक्तीने कारवाई होईलच ही मोदींची गॅरंटी आहे. याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

बंगळुरूमध्ये काँग्रेस नेत्यांच्या नातेवाईकांच्या घरी १४२ कोटी रुपये जप्त करण्यात आले, लालू प्रसाद यादव आणि कुटुंबाने मोठे आर्थिक गैरव्यवहार केले, ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातील काही लोक तुरुंगात आहेत, तमिळनाडूमधील मंत्री तुरुंगात आहेत, दिल्लीचे मंत्री तुरुंगात आहेत, झारखंडमध्ये मोठे आर्थिक गैरव्यवहार सापडले आहेत, असेही आरोप त्यांनी केले. तसेच विविध आर्थिक गैरव्यवहारांमुळे काँग्रेसला छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये लोकांनी नाकारले म्हणत अनेक घोटाळ्यांची जंत्री वाचून दाखवली.

हेही वाचा 

Back to top button