पराभवानंतरचा ‘दुरावा’…ममतांच्‍या पाठोपाठ नितीशकुमारही मारणार ‘इंडिया’ आघाडीच्‍या बैठकीला दांडी!

पराभवानंतरचा ‘दुरावा’…ममतांच्‍या पाठोपाठ नितीशकुमारही मारणार ‘इंडिया’ आघाडीच्‍या बैठकीला दांडी!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशामुळे भाजपचा आत्‍मविश्‍वास दुणावला आहे. तर पराभवाचे चिंतन करण्‍यासाठी भाजप विरोधी इंडिया आघाडीतील पक्षांनी ६ डिसेंबर रोजी दिल्‍लीत बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला जनता दल संयुक्‍तचे नेते आणि बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार उपस्‍थित राहण्‍याची शक्‍यता नाही. नितीश कुमार यांच्‍याऐवजी जनता दल संयुक्‍तचे लालन सिंह आणि संजय कुमार झाला दिल्‍लीतील बैठकीला उपस्‍थित राहतील, असे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे. ( Nitish Kumar likely to skip INDIA bloc meet )

पाच राज्‍यांतील विधानसभा पैकी मध्‍य प्रदेश, राजस्‍थान आणि छत्तीसगडमध्‍ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. पराभवाचे चिंतन करण्‍यासाठी रविवार ३ डिसेंबर रोजीच काँग्रेसने इंडिया आघाडीच्‍या नेत्‍यांची दिल्‍लीत ६ डिसेंबर रोजी बैठकीची घोषणा केली होती. इंडिया आघाडीतील सर्व मित्र पक्षांच्‍या नेत्‍यांना काँग्रेस अध्‍यक्ष मल्‍लिकार्जून खर्गे यांनी निमंत्रण दिले आहे. ( Nitish Kumar likely to skip INDIA bloc meet )

ममता बॅनर्जी यांच्‍यापाठोपाठ नितीशकुमारांचीही इंडिया बैठकीकडे पाठ

दिल्लीतील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्‍थानी बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीवर या बैठकीत चर्चा होईल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. दरम्‍यान, या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर बंगालमधील कामाचा हवाला देत बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचे स्‍पष्‍ट केले आहे. आता त्‍यांच्‍या पाठोपाठ बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनीही या बैठकीला उपस्‍थित राहता येणार नसल्‍याची शक्‍यता असल्‍याचे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे. नितीश कुमार यांच्‍याऐवजी जनता दल संयुक्‍तचे लालन सिंह आणि संजय कुमार झाला दिल्‍लीतील बैठकीला उपस्‍थित राहतील, असेही या वृत्तात म्‍हटलं आहे.

आता भाजपचे सरकार १६ राज्‍यांमध्‍ये

तीन राज्‍यांमधील विधानसभा निवडणूक निकालानंतर आता गोवा, गुजरात, मध्‍य प्रदेश, राजस्‍थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर या १२ राज्‍यांमध्‍ये भाजप स्‍वबळावर सत्तेत आले आहे. तर महाराष्ट्र, नागालँड, सिक्कीम आणि मेघालय या चार राज्यांमध्ये भाजपची अन्‍य पक्षांच्‍या आघाडी सरकार सत्तेत आहे.

काँग्रेस स्‍वबळावर केवळ तीन राज्‍यांमध्‍ये

हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्‍यांमध्‍ये काँग्रेस स्‍वबळावर सत्तेत आहे. तर झारखंड आणि बिहारमध्‍ये अन्‍य पक्षांबरोबरील आघाडी सरकारमध्‍ये काँग्रेसचा समावेश आहे. भाजप शासित प्रदेशांनी भारताच्या 58 टक्के भूभाग तर 57 टक्के लोकसंख्या व्‍यापली आहे. तर , काँग्रेस शासित राज्ये देशाच्या 41 टक्के भूभागासह 43 टक्के लोकसंख्या व्यापतात.

'या' राज्‍यामंध्‍ये स्‍थानिक पक्षांचा वरचष्‍मा

देशातील आठ राज्‍यांमध्‍ये स्‍थानिक पक्षांचाच वरचष्‍मा आहे. राज्‍य आणि कंसात सत्ताधारी पक्ष पुढीलप्रमाणे : पश्‍चिम बंगाल (तृणमूल काँग्रेस), तामिळनाडू (द्रमुक), केरळ ( लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट), आंध्र प्रदेश (वायएसआर काँग्रेस पार्टी ), मिझोराम ( मतमोजणी सुरु स्‍थानिक आघाडी 'झेडपीएम'ची सत्तेकडे वाटचाल), पंजाब (आम आदमी पार्टी ), दिल्‍ली (आम आदमी पार्टी ), ओडिशा ( बिजू जनता दल- बीजेडी)

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news