Uttarkashi tunnel rescue : बोगद्यातून सुटका झालेल्या ४१ कामगारांशी पीएम मोदींनी साधला संवाद | पुढारी

Uttarkashi tunnel rescue : बोगद्यातून सुटका झालेल्या ४१ कामगारांशी पीएम मोदींनी साधला संवाद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशभरात १२ नोव्‍हेंबर २०२३ रोजी दिवाळीचा पहिला दिवस साजरा होत असतानाच उत्तराखंड राज्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सियालक्‍यारा बोगद्याचे प्रवेशद्वारापासून सुमारे २०० ते ३०० मीटर आत स्‍लॅब कोसळला. यामुळे बोगद्यात  ४१ कामगार  अडकले. यानंतर सलग १७ दिवस राबवलेल्‍या गेलेल्‍या अथक मदतकार्याच्‍या जोरावर सर्व कामगारांची सुटका करण्‍यात मंगळवारी (दि. २८ ) यश आले. (Uttarkashi Tunnel rescue operation) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ४१  कामगारांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. (Uttarkashi tunnel rescue)

 Uttarkashi tunnel rescue : त्यांच्या धैर्याने आणि संयमाने सर्वांना प्रेरणा दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.२९) उत्तराखंडमधील सिल्कियारा बोगद्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेल्या कामगारांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यांच्या  आरोग्याची विचारपूस केली आणि त्यांना प्रोत्साहनही दिले. बचावकार्य यशस्वी करणाऱ्या सैनिकांचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “त्यांच्या शौर्याने आणि दृढनिश्चयाने आमच्या कामगार बांधवांना नवसंजीवनी दिली आहे. या मिशनमध्ये सामील असलेल्या प्रत्येकाने माणुसकी आणि टीमवर्कचे एक अद्भुत उदाहरण ठेवले आहे.” त्यांच्या धैर्याने आणि संयमाने सर्वांना प्रेरणा दिली आहे.  आमचे हे मित्र प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर त्यांच्या प्रियजनांना भेटणार आहेत ही खूप समाधानाची बाब आहे.’

सिल्कियारा बोगद्याचे सेफ्टी ऑडीट करणार : नितीन गडकरी

तब्बल 17 दिवसांपासून सिल्कियारा बोगद्यामध्ये अडकलेल्या 41 मजुरांची सुटका करण्यात यश आले. बोगदा बांधकामाची जबाबदारी हातळणाऱ्या परिवहन खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मिडियावर या सुटका मोहिमेबद्दल प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला. सोबतच अशा प्रकारचा हा पहिलाच अनुभव असल्याने हिमालयाच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याची काळजी घेण्यात येईल, असे प्रतिपादन केले. पुढे म्हणाले की,” पंतप्रधान कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा, उत्तराखंड सरकार आणि स्थानिक जनतेने रात्रंदिवस मेहनत करून वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी केली हे अतिशय गंभीर संकट होते. हा पहिलाच अनुभव होता. ज्यांचे मजुरांचे प्राण वाचले त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. प्राण वाचविण्यासाठी केंद्र, राज्याच्या यंत्रणा, अभियंत्यांनी जोखीम घेऊन काम केले त्यासाठी या यंत्रणांचे तसेच पंतप्रधान मोदी, उत्तारखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचे आभार व्यक्त करतो. या घटनेतून बरेच काही शिकायला मिळाले आहे. बोगद्याचे सेफ्टी ऑडिट केले जाईल. हिमालयाची रचना ठिसूळ आहे. त्यामुळे बोगदा बांधताना यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न असेल, असेही गडकरी यांनी सोशल मिडियावरील संदेशात म्हटले आहे. (Uttarakhand Tunnel Rescue)

हेही वाचा 

Back to top button