Telangana Assembly Election : तेलंगणामध्‍ये ‘केसीआर’ यांना आव्‍हान देणारे रेवंत रेड्डी आहेत तरी कोण? | पुढारी

Telangana Assembly Election : तेलंगणामध्‍ये 'केसीआर' यांना आव्‍हान देणारे रेवंत रेड्डी आहेत तरी कोण?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तेलंगणा देशातील नवखे राज्‍य. आंध्र प्रदेशचे विभाजन होवून या राज्‍याची स्‍थापना २ जून २०१४ रोजी झाली. केवळ ९ वर्ष वय असणारे हे राज्‍य. स्‍वतंत्र तेलंगणा राज्‍याच्‍या मागणीसह राज्‍याच्‍या स्‍थापनेपर्यंत राजकारणात एकच चेहरा मुख्‍य होता तो म्‍हणजे सत्ताधारी भारत राष्‍ट्र समितीचे सर्वेसर्वा आणि मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर). या राज्‍याचे संस्‍थापक अशी त्‍यांची राजकारणातील ओळख. तेलंगणा राज्‍याची निर्मिती झाल्‍यानंतर के. चंद्रशेखर राव यांनी सलग दोनवेळा राज्‍यात सत्ता काबीज केली. मात्र यंदा राज्‍यातील विधानसभा निवडणुकीत (Telangana Assembly Election) के. चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांना ‘हॅटट्रिक’ पासून (सलग तिसर्‍यांदा सत्ता स्‍थापन करण्‍यापासून) वंचित ठेवण्‍यासाठी काँग्रेस पक्षाने मोठे आव्‍हान उभे केल्‍याचे चित्र आहे. राज्‍यात पक्षाला चर्चेत आणण्‍यास अग्रस्‍थानी आहेत पक्षाचे प्रदेशाध्‍यक्ष रेवंत रेड्डी (Revanth Reddy). तेलंगणा विधानसभा निवडणूक ही आता के चंद्रशेखर राव विरुद्ध काँग्रेस, अशी नाही तर के.चंद्रशेखर राव विरुद्ध रेवंत रेड्डी अशी रंगली आहे. जाणून घेवूया तेलंगणात आपली नवी राजकीय ओळख निर्माण करणार्‍या रेवंत रेड्डी यांच्‍याविषयी…

Telangana Assembly Election : कोण आहेत रेवंत रेड्डी ?

तेलंगणाचे मुख्‍यमंत्री के.चंद्रशेखर राव यांना आव्‍हान देणारे रेवंत रेड्डी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली. यानंतर त्‍यांनी के.चंद्रशेखर राव यांच्‍या तेलंगणा राष्‍ट्र समितीमध्‍ये प्रवेश केला. २००४ मध्ये कलवाकुर्ती विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्‍याची इच्‍छा त्यांनी व्‍यक्‍त केली; परंतु त्यांना तिकीट नाकारले गेले. कारण या निवडणुकीत तेलंगणा राष्‍ट्र समितीची काँग्रेससोबत आघाडी होती. जागा वाटपाच्या सूत्रानुसार हा मतदारसंघ काँग्रेसकडे देण्‍यात आला होता. तिकिट नाकारल्‍याने रेवंत रेड्डी तेलंगणा राष्‍ट्र समितीमधून बाहेर पडले.

जिल्‍हा परिषदेची निवडणूक अपक्ष म्‍हणून लढवली आणि जिंकली

2006 मध्ये रेवंत रेड्डी यांनी अपक्ष म्हणून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. त्यांची लढत प्रबळ प्रतिस्पर्धी संकीरेड्डी जगदीश्वर रेड्डी यांच्याशी  होती. ही निवडणूक त्‍यांनी  २० पेक्षा कमी मतांनी जिंकली होती.

तेलगु देसम पार्टीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्‍ये प्रवेश

तेलंगणा राष्‍ट्र समितीमधून बाहेर पडल्यानंतर रेवंत रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्‍या तेलगू देसम पार्टीत प्रवेश केला. २००९ आणि २०१४ मध्‍ये त्‍यांनी कोडंगल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. २०१५ मध्‍ये कॅश फॉर व्होट घोटाळ्यात त्‍यांना अटकही झाली होती. एमएलसी निवडणुकीत आपल्या मतांवर प्रभाव टाकण्यासाठी नामनिर्देशित आमदाराला लाच दिल्याचा आरोप त्‍यांच्‍यावर होता. स्‍वंतत्र राज्‍य निर्मितीनंतर तेलंगणात तेलगू देसम पार्टीचा प्रभाव कमी होत गेला. यानंतर रेवंत यांनी ऑक्टो‍बर २०१७ मध्‍ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Telangana Assembly Election : अल्‍पवधीत काँग्रेसच्‍या प्रदेशाध्‍यक्षपदी झेप

अल्‍पवधीतच रेवंत यांचा काँग्रेसमधील वाढता प्रभावाची के. चंद्रशेखर राव यांना जाणीव झाली. त्‍यामुळे २०१८ मध्‍ये कोडंगल विधानसभा निवडणूक त्‍यांचा पराभव करण्‍यासाठी राव यांनी आपले सर्वस्‍वपणला लावले होते, अशी चर्चा आहे. त्‍यांनी केलेल्‍या प्रयत्‍नामुळेच रेवंत यांना मागील विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्‍यांनी २०१९ मध्‍ये मलकाजगिरी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. ते खासदार झाले. यानंतर तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने त्‍यांना प्रदेशाध्‍यक्षपदी नियुक्‍त केले. यंदाच्‍या निवडणुकीत ते काँग्रेसचे स्टार प्रचारक असल्याने त्‍यांनी कोडंगल आणि कामारेड्डी या मतदारसंघामधील प्रचाराची जबाबदारी आपल्‍या दोन भावांवर सोपवली आहे.

उत्‍कृष्‍ट ‘कथाकार’ असणारे काँग्रेसचे स्‍टार प्रचारक

रेवंत रेड्‍डी यांचे प्रभावी वक्तृत्त्व हे त्‍यांच्‍या राजकारणातील प्रभावाचे प्रमुख वैशिष्‍ट्य आहे. तेलंगणामधील काँग्रेसचे नेते मणिकम टागोर हे रेवंत यांना उत्‍कृष्‍ट कथाकार, असे संबोधतात. मतदारांशी थेट संवाद साधण्‍याच्या हातोटीमुळे त्‍यांच्‍या सभांना उस्‍त्‍फूर्त प्रतिसाद मिळत असल्‍याचे चित्र आहे. या वैशिष्ट्यामुळेच रेवंत या निवडणुकीत तेलंगणा काँग्रेसमधील सर्व मतदारसंघांत सर्वाधिक मागणी असलेला स्‍टार प्रचारक बनले आहेत.

तेलंगणा विधानसभा निवडणूक : के चंद्रशेखर राव विरुद्ध रेवंत रेड्डी

प्रदेशाध्‍यक्षपदाच्‍या धुरा संभाळल्‍यानंतर रेवंत यांनी के. चंद्रशेखर राव यांच्‍यावर हल्‍लाबोल सुरु केला. तेलंगणा राज्‍य निर्मितीचे संपूर्ण श्रेय काँग्रेसच्‍या नेत्‍या सोनिया गांधी यांना जाते. त्‍यांनी आंध्र प्रदेशमधील सत्ता सोडत तेलंगणा राज्‍याची निर्मिती केली, असे प्रचार करत त्‍यांनी के. चंद्रशेखर राव यांचे महत्त्‍व कमी करण्‍याचा प्रयत्‍न केला. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली असताना आता
३ डिसेंबरला ( तेलंगणा विधानसभा निवडणूक निकालाचा दिवस ) के. चंद्रशेखर राव राजकारणातून निवृत्त होतील. राज्‍यातील विविध भ्रष्‍टाचार प्रकरणी यापुढे त्‍यांचा मुक्‍काम चेर्लापल्‍ली कारागृहात असेल, असा दावा रेवंत रेड्डी करत आहेत. तेलंगणाच्‍या विधानसभा निवडणुकीत आरोप-प्रत्‍यारोपातून एकमेकांवर जोरदार चिखलफेक होत आहे. राव पिता-पुत्रांनी रेवंत यांना “चोर” असे संबोधले तसेच काँग्रेसची उमेदवारी देण्‍यासाठी किती दर आहे, असा सवाल करत रेड्डी यांच्‍यावर तिकिटे विकल्याचा आरोप करत आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणूक ही आता के चंद्रशेखर राव विरुद्ध काँग्रेस, अशी नाही तर के.चंद्रशेखर राव विरुद्ध रेवंत रेड्डी अशी रंगली आहे.

मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची पुन्‍हा प्रादेशिक भावनांना हात

काँग्रेसने मोठे आव्‍हान निर्माण केल्‍याने आता मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव पुन्‍हा एकदा तेलंगणा राज्‍यासाठी कसा संघर्ष केला. याचे स्‍मरण करुन देत आहेत. राज्यनिर्मितीसाठी अनेक लोकांच्या बलिदान दिले. लोकांनी तेलंगणासाठी आमरण उपोषण केले, अशीही आठवण ते करुन देत आहेत. तसेच आंध्र प्रदेशमध्‍ये असताना तेलंगणा कसे मागास राहिले, हेही सांगत आहेत. तेलंगणाच्या प्रादेशिक भावनांना हात घालत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील विधानसभा निवडणीकीत म्‍हणजे डिसेंबर २०१८ मध्ये के. चंद्रशेखर राव यांनी सरकारच्या कल्याणकारी योजना आणि राज्यात केलेल्या विकासकामांचा उल्लेख प्रचारात केला होता. मात्र, यंदाच्‍या निवडणुकीच्‍या प्रारंभी त्‍यांनी रणनीती बदलली असल्याचे दिसते. कारण कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर काँग्रेसने आता तेलंगणातही आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्‍न केले आहेत.

दोन्ही नेत्‍यांच्‍या राजकीय अस्‍तित्‍वाची लढाई

तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा सामना आता के चंद्रशेखर राव विरुद्ध काँग्रेस असा नाही तर के चंद्रशेखर राव विरुद्ध रेवंत रेड्डी असा रंगला आहे. दोन्‍ही नेत्‍यांच्‍या राजकीय अस्‍तित्‍वासाठी ही निवडणुक महत्त्‍वपूर्ण आहे. कारण पक्षांतर्गत ज्‍येष्‍ठ नेत्‍यांची नाराजीला सामोरे जात के. चंद्रशेखर राव यांच्‍या सारख्‍या राज्‍यातील मातब्‍बर नेत्‍यांचा सामना करण्‍याचे दुहेरी आव्‍हान त्‍यांच्‍यासमोर आहे. आता ३ डिसेंबर रोजी या सामन्‍याचा निकाल जाहीर होणार आहे, तोपर्यंत तेलंगणामध्‍येही के. चंद्रशेखर राव आणि रेवंत रेड्डी यांच्‍यातील राजकीय संघर्ष टिपेला पोहचणार आहे.

हेही वाचा :

Back to top button