NCP Crisis : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही पवार गटांमध्ये सुनावणी | पुढारी

NCP Crisis : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही पवार गटांमध्ये सुनावणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी – कॉंग्रेसवरील हक्कासाठी बनावट दस्तावेज सादर करण्याचा अजित पवार गटाचा प्रयत्न म्हणजे निर्लज्ज फसवणूक असून या फसवणुकीबद्दल अजित पवार गटाविरुद्ध निवडणूक आयोगाने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे आज (दि.२०) सुनावणीदरम्यान केली. तर, ऐन निवडणूक काळात शरद पवार गटाकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचे जोरदार प्रत्युत्तर अजित पवार गटाने दिले आहे. आता या प्रकरणावर पुढील सुनावणी शुक्रवारी २४ नोव्हेंबरला होणार आहे. (NCP Crisis)

राष्ट्रवादी – कॉंग्रेस पक्ष आणि चिन्हावरील हक्कासाठी शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या कायदेशीर लढाईला दिवाळीनंतर आजपासून पुन्हा सुरवात झाली. आयोगासमोर आज (दि.२०) दुपारी चारला सुनावणी अपेक्षित असताना परंतु शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी हे उशिरा पोहोचल्याने जवळपास तासभराच्या विलंबाने सुनावणीला सुरूवात झाली. या सुनावणीसाठी स्वतः शरद पवार यांच्यासह, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण हे आयोगासमोर हजर झाले होते. तर, अजित पवार गटातर्फे खासदार सुनिल तटकरे, रूपाली चाकणकर, सुरज चव्हाण हे देखील आयोगात पोहोचले होते. विशेष म्हणजे पहिल्यांदाच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील निवडणूक आयोगासमोर सुनावणीसाठी पोहोचले होते.

शरद पवार गटाची बाजू मांडताना वरिष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांचा युक्तिवाद अजित पवार गटाच्या प्रतिज्ञापत्रांमधील बनावटपणा या भोवती केंद्रीत राहिला. सिंघवी यांच्यानंतर शरद पवार गटाची बाजू मांडणारे वकील देवदत्त कामत यांनी आयोगाकडे युक्तिवाद सुरू केला. तसेच सुनावणीची वेळ वाढवून देण्याची मागणी केली. तत्पूर्वी सिंघवी यांनीही त्यांच्या युक्तीवादादरम्यान मुदतवाढीची मागणी केली होती. यावरून सिंघवी आणि अजित पवार गटातर्फे बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मुकूल रोहतगी यांची खडाजंगीही झाली. (NCP Crisis)

ऐन निवडणुकीचा काळ असताना शरद पवार गटातर्फे जाणीवपूर्वक वेळकाढूपणा सुरू असल्याचाही दावा रोहतगी यांनी केला. अखेरीस निवडणूक आयोगाने सिंघवी यांना मागील युक्तिवादाचा दाखला देत तेच तेच मुद्दे पुन्हा मांडू नका, असे फटकारले. शुक्रवारी शरद पवार गटातर्फे युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर पुढील आठवड्यात मंगळवारी ( दि. २८) अजित पवार गट आपले म्हणणे मांडेल, असे मुकूल रोहतगी यांनी सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

सुनावणी संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अभिषेक सिंघवी यांनी सांगितले, की अजित पवार गटातर्फे सादर झालेली हजारो प्रतिज्ञापत्रे बनावट असल्याने त्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. अजित पवार गटाच्या लेखी दस्तावेजांमधील बनावटपणा हा फसवणुकीच्या २४ निकषांवर आधारीत असल्याचाही दावा सिंघवी यांनी केला. या दस्तावेजामध्ये दिवंगत व्यक्तीची प्रतिज्ञापत्रे, झोमॅटो विक्रेत्याची, विमा एजंटची, अल्पवयीन व्यक्तींचीदेखील प्रतिज्ञापत्रे असल्याचे सांगताना सिंघवी म्हणाले की, निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असताना अजित पवार गटाने २६ ऑक्टोबरला चौधरी प्रताप सिंह यांचे समर्थन असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. प्रत्यक्षात चौधरी प्रतापसिंह हे शरद पवार यांचे समर्थक असून त्यांना आज निवडणूक आयोगासमोर येऊन प्रतिज्ञापत्र सादर केले.

अशा फसवणुकीची दखल घेऊन आयोगाने याची दखल घेऊन गुन्हा दाखल करावा, या मागणीचा पुनरुच्चार करताना सिंघवी यांनी अजित पवार गटाच्या बनावट दस्तावेजांपैकी केवळ नऊ हजार दस्तावेजांचाच दाखला दिला असल्याकडेही लक्ष वेधले. त्याचप्रमाणे अजित पवार गटाच्या एकाही प्रतिज्ञापत्रामध्ये शरद पवार यांना विरोध करत असल्याचा स्पष्ट उल्लेख नसल्याचा दावा करताना आयोगाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. (NCP Crisis)

हेही वाचा :

 

Back to top button