![Uttar Pradesh New](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F10%2FUttar-Pradesh-New.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात फतेहपूर येथे हृदयद्रावक हत्याकांड घडले आहे. एकाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी एकाच ब्राह्मण कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. सोमवारी (दि.२) घडलेल्या या हत्याकांडाने देवरिया जिल्हा हादरला आहे. जमिनाच्या वादातून हे हत्यांकांड घडल्याची माहिती येथील स्थानिक माध्यमांनी दिली आहे. (Uttar Pradesh News)
उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील (ता. रुद्रपूर) फतेहपूर गावात सोमवारी (दि.२) सकाळी ही घटना घडली. माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेमचंद यादव यांच्या हत्येनंतर हे हत्याकांड घडवण्यात आले. जमिनीच्या वादातून माजी जिल्हा पंचायत सदस्याची हत्या झाली होती. त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडात एकूण ६ जणांची निर्घृण हत्या झाली आहे. (Uttar Pradesh News)
हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिस विभागात खळबळ उडाली. दरम्यान तातडीने डीएम, एसपी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अनेक पोलिस ठाण्यांमधून पोलिसांना पाचारण करण्यात आले. सध्या घटनास्थळावरील अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असेही माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत फतेहपूर येथील रहिवासी सत्य प्रकाश दुबे आणि प्रेमचंद यादव यांच्यात भावाच्या जमिनीवरून वाद सुरू होता. प्रेमचंद जेव्हा सत्यप्रकाश दुबे यांच्या घरी पोहोचले तेव्हा वाद इतका वाढला की त्याने इतरांसोबत प्रेमचंद यादव यांची हत्या केली. सत्यप्रकाश दुबे याने प्रेमचंद यादव यांची विटेने ठेचून हत्या केली. त्यानंतर घटनेची माहिती प्रेमचंद यादव यांच्या कुटुंबीयांना समजली. प्रेमचंद यादव यांच्या घरातील लोक दुसऱ्या गटाला आव्हान देत सत्यप्रकाश दुबे यांच्या दारात पोहोचले. दरम्यान संतप्त लोकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील सर्वांवर धारदार शस्त्रांनी वार करत, एक एक करून दुबे यांच्या कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली. (Uttar Pradesh News)
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, देवरिया जिल्ह्यातील दुर्दैवी घटना अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह आहे. शोकाकुल कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. घटनास्थळी पोहोचल्यानंतर एडीजी/आयुक्त/आयजी यांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि जखमींवर योग्य उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेवर एडीजी म्हणाले की, या घटनेतील दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.