पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताच्या पहिल्या हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचे गुरुवारी आज सकाळी ११.१५ वाजता चेन्नई येथे निधन झाले. त्यांनी चेन्नईतील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर त्यांची मुलगी डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी डॉ. एम. एस. स्वामीनाथन हे 'अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध होते, अशी प्रतिक्रिया एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. (MS Swaminathan Passed Away) डॉ. सौम्या स्वामीनाथन ह्या जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी उपमहासंचालक आहे.
डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांची मुलगी डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. दरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. स्वामीनाथन हे 'अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि समाजातील गरीबांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध होते. (MS Swaminathan Passed Away)
भारताच्या 'हरितक्रांतीचे जनक आणि दिग्गज कृषी शास्त्रज्ञ डॉ. स्वामीनाथन यांच्या पश्चात डॉ. सौम्या यांच्यासह आणखी दोन मुली आहेत. मधुरा स्वामीनाथन ज्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, बंगळूर येथे प्राध्यापक आहे. तर नित्या राव या यूकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लिया येथील NISD मध्ये संचालक आहेत. डॉ. स्वामीनाथन यांच्या पत्नी मिना स्वामीनाथन यांचे गेल्या वर्षी मार्चमध्ये निधन झाले होते. (MS Swaminathan Passed Away)
डॉ. सौम्या पुढे म्हणाल्या की, त्यांचे वडील डॉ. एम. एस. स्वामीनाथन हे देशातील मोजक्या लोकांपैकी एक होते, ज्यांनी ओळखले होते की शेतीमध्ये महिलांना दुर्लक्षित केले जाते. त्यामुळे त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी प्रामुख्याने पुढाकार घेतला होता, असे त्या म्हणाल्या.