Priyanka Gandhi: प्रियांका गांधींचे पीएम मोदींना पत्र, हिमाचलमधील आपत्तीला 'राष्ट्रीय आपत्ती' घोषित करा
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा यांनी शुक्रवारी (दि.१५ सप्टेंबर) पंतप्रधान मोदींना पत्र लिहले. हिमाचल प्रदेशातील नैसर्गिक आपत्तीला ‘राष्ट्रीय आपत्ती’ म्हणून घोषित करा, अशा मागणीचे पत्र प्रियांका यांनी मोदींना लिहले आहे. गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे नैसर्गिक आपत्ती उद्भवली होती. दरम्यान प्रियांका गांधी यांनी नुकताच हिमाचल प्रदेशचा दौरा केला होता. याआधी काँग्रेसने हिमाचल प्रदेशसाठी पंतप्रधानांकडे 10 हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली होती.
प्रियांकाने आपल्या पत्रात म्हटले आहे की, या आपत्तीत आतापर्यंत 428 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. शेकडो लोक बेघर झाले आहेत. 16,000 हून अधिक प्राणी आणि पक्षी या आपत्तीचे बळी ठरले आहेत. राज्य महामार्ग खचल्याने त्यांचा राज्याशी संपर्क तुटला आहे. सर्वत्र विध्वंसाचे दृश्य आहे. राज्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Congress general secretary Priyanka Gandhi Vadra writes to Prime Minister Narendra Modi, urging him to declare the natural calamity triggered due to the floods and landslides in Himachal Pradesh as a National Disaster. pic.twitter.com/IZvnLook9Y
— ANI (@ANI) September 15, 2023
या शोकांतिकेत हिमाचलमधील लोक मदतीच्या आपल्याकडे आशेने पाहत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने विदेशी सफरचंदांवर आयात शुल्कात केलेली कपातीमुळे सफरचंद उत्पादक शेतकरी आणि बागायतदारांना दुहेरी आर्थिक फटका बसणार आहे, असेही त्या म्हणाल्या. या कठीण काळात शेतकऱ्यांना असा धक्का देऊ नये. त्यापेक्षा केंद्र सरकारकडून येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाल्यास त्यांना दिलासा मिळेल, असेही प्रियांका यांनी या पत्रात म्हटले आहे.
मी तुम्हाला आवाहन करतो की, या आपत्तीला 2013 च्या केदारनाथ दुर्घटनेप्रमाणे ‘राष्ट्रीय आपत्ती’ म्हणून घोषित करण्यात यावी. तसेच पीडितांना आणि राज्याला आर्थिक मदत देण्यात यावी. जेणेकरून हिमाचलच्या बंधू-भगिनींना दिलासा मिळेल. यामुळे राज्याची पुनर्बांधणी योग्य प्रकारे करता येईल. पुढे प्रियांका गांधी यांनी पीएम मोदींना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, संपूर्ण देश हिमाचलच्या पाठीशी उभा राहण्यास पुढे येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारही हिमाचलच्या लोकांप्रती संवेदनशील राहून, त्यांच्यामदतीसाठी योग्य पावले उचलेल, अशी मला आशा आहे, असेही स्पष्ट केले आहे.