

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी दिले आहेत. प्रियंका गांधी यांनी प्रथम संसदेत पोहोचले पाहिजे. त्या लोकसभेत निवडून गेल्या तर चांगले होईल. अमेठी असो किंवा सुलतानपूर पक्षाला योग्य वाटेल त्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढायला हवी, असे मत प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी व्यक्त केले. (Priyanka Gandhi)
काँग्रेस पक्षाकडून त्या अमेठी किंवा सुलतानपूर या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असे बोलले जात आहे. अमेठी मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, २०१९ च्या लोकसभा निडवणुकीत या मतदार संघात काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव करत स्मृती इराणी यांनी लोकसभेत प्रवेश केला होता. (Priyanka Gandhi)
भाजपवर गंभीर आरोप केल्याने मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रियंका गांधी आणि कमलनाथ यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले, असा दावा काँग्रेसने केला होता. यानंतर राजकारण चांगलेच तापले होते. भाजपला पुढील निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळेच गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मध्य प्रदेशच्या ४१ जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या. (Priyanka Gandhi)