'एक देश, एक निवडणूक' देशातील राज्यांवर हल्ला : राहुल गांधी
दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी १८ ते २२ सप्टेंबर रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. यानंतर हे अधिवेशन ‘एक देश, एक निवडणूक’ यासाठीच घेतले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. यावर सरकारची ‘एक देश, एक निवडणूक’ ही कल्पना भारतातील सर्व राज्य आणि संघराज्यांवर हल्ला आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर केली आहे. राहुल गांधी यांनी आज (दि.३) त्यांच्या अधिकृत ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून यासंदर्भात पोस्ट (Rahul Gandhi Vs BJP) केली आहे.
राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ हा भारतावर हल्ला आहे. जो राज्यांचा संघ आहे. भारत हा राज्यांचा संघ आहे. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ ही कल्पना केंद्र आणि त्याच्या सर्व राज्यांवर हल्ला आहे. (Rahul Gandhi Vs BJP)
INDIA, that is Bharat, is a Union of States.
The idea of ‘one nation, one election’ is an attack on the 🇮🇳 Union and all its States.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 3, 2023
Rahul Gandhi Vs BJP : खर्गेंना डावलत अधीर रंजन चौधरींना केंद्राच्या समितीत स्थान
विशेष म्हणजे देशात एकावेळी निवडणुका घेण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी (दि.२ सप्टें) आठ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीमधील आठ सदस्यांमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या नावाचाही समावेश होता. मात्र, चौधरी यांनी समितीचा सदस्य होण्यास नकार दिला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना समितीत सहभागी न केल्याबद्दल चौधरी यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. (Rahul Gandhi Vs BJP)
अधिवेशनासाठी गठीत समितीमध्ये यांचा सहभाग
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असेल, असे कायदा मंत्रालयाने म्हटले आहे. या समितीमध्ये गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, माजी वित्त आयोगाचे अध्यक्ष एनके सिंग, माजी लोकसभेचे सरचिटणीस सुभाष सी कश्यप, ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि माजी मुख्य दक्षता आयुक्त संजय कोठारी यांचा समावेश करण्यात आला आहे.