

पुढारी ऑनलाईन : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे माजी महासंचालक डॉ. व्ही. एस अरुणाचलम यांचे बुधवारी निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. कॅलिफोर्नियातील जवळच्या नातेवाईकांच्या घरी त्यांचे निधन झाले, असे त्यांच्या कुटुंबीयांने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अरुणाचलम यांच्या निधनावर पीएम मोदी यांनी देखील दु:ख व्यक्त (Former DRDO chief) केले आहे.
अरुणाचलम यांनी भाभा अणू संशोधन केंद्र (BARC), नॅशनल एरोनॉटिकल लॅबोरेटरी आणि डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. २०१५ मध्ये, अरुणाचलम यांना वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी DRDO चा जीवनगौरव पुरस्कार प्रदान (Former DRDO chief) करण्यात आला होता.
अरुणाचलम हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) प्रमुख होते. 1982-92 पर्यंत ते संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागारही होते. अभियांत्रिकी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील योगदानाबद्दल त्यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (1980), पद्मभूषण (1985) आणि पद्मविभूषण (1990) प्रदान करण्यात आले.
डॉ. व्ही.एस. अरुणाचलम यांच्या निधनाने वैज्ञानिक समुदाय आणि धोरणात्मक जगामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे ज्ञान, संशोधनाची आवड आणि भारताच्या सुरक्षा क्षमतांना बळकट करण्यासाठी भरीव योगदानाबद्दल त्यांचे खूप कौतुक झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि हितचिंतकांप्रती संवेदना. ओम शांती, अशा भावना व्यक्त करत पीएम मोदी यांनी अरुणाचलम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे की, संरक्षण मंत्र्यांचे माजी वैज्ञानिक सल्लागार डॉ. व्ही. एस. अरुणाचलम यांच्या निधनाची बातमी कळताच खूप दुःख झाले. संरक्षण, तंत्रज्ञान आणि आण्विक विषयांवर ते अनेकांचे मार्गदर्शक होते.
काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, राजा रामण्णा यांच्यानंतर अरुणाचलम यांनी 1982-92 दरम्यान दशकभर डीआरडीओला मार्गदर्शन केले आणि आकार दिला. त्यानंतर डॉ. एपीजे अब्दुल कलाम या पदावर राहिले. डॉ. अरुणाचलम यांचे विशेषत: पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी अतिशय सौहार्दपूर्ण संबंध होते. बीएआरसी आणि सीएसआयआरमधील उत्कृष्ट कारकीर्दीनंतर ते डीआरडीओमध्ये सामील झाले. त्याला विनोदाची अद्भुत भावना होती.