No Confidence Motion : ‘अविश्वासा’वर चर्चा घडवून विरोधकांनी केले स्वतःचेच ‘वस्त्रहरण’: मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

No Confidence Motion : 'अविश्वासा'वर चर्चा घडवून विरोधकांनी केले स्वतःचेच ‘वस्त्रहरण’: मुख्यमंत्री शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर 8 आॅगस्टपासून सलग तीन दिवस चर्चा होत आहे. या चर्चेला आज गुरुवारी (दि.10) पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत  म्हंटले आहे की, अविश्वासाचा ठरावावर चर्चा घडवून विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत. जगभरात पंतप्रधानांच्या नेतृत्वाला जी मान्यता मिळत आहे, ती पाहून विरोधकांचा जळफळाट झाला आहे. (No Confidence Motion)

No Confidence Motion : विरोधकांचा जळफळाट झाला आहे

मणिपूर हिंसाचारावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ सुरूच आहे. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत हजर राहून मणिपूर हिंसाचारावर निवेदन करावे,अशी मागणी लावून धरली आहे. मणिपूर हिंसाचारावरून लोकसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षांकडून मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे.

देशभरात विश्वास गमावलेल्या विरोधी पक्षाने संसदेत अविश्वास ठराव मांडलाय. खरं तर या ठरावावर चर्चा घडवून विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. कॉंग्रेसच्या ५५-६० वर्षांच्या कालखंडात जेवढी विकासकामे झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक विकास गेल्या ९ वर्षांत झाला आहे. जगभरात पंतप्रधानांच्या नेतृत्वाला जी मान्यता मिळत आहे, ती पाहून विरोधकांचा जळफळाट झाला आहे.

देशातील जनतेने विरोधकांवर वारंवार अविश्वास दाखवलाय. २०१४ आणि २०१९ मध्ये सामान्य नागरिकांचा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यावरील प्रगाढ विश्वास दिसून आला. २०२४ साली तो वृद्धिंगत होईल, याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही. भारताच्या नागरिकांना आता फक्त सर्वांगीण प्रगती आणि आर्थिक विकास हवा आहे. एकमेकांचे हात हाती घेऊन ऐक्याच्या घोषणा देणारे आणि पायात पाय घालून पाडण्याची संधी शोधणारे विरोधक आता कालबाह्य झाले आहेत. ते अविश्वास ठरावावर तोंडावर कसे आपटतात, हे गेल्या दोन दिवसांपासून सारा देश पाहतोय. पंतप्रधानांचे आणि एनडीएच्या घटक पक्षांचे स्थान या चर्चेनंतर अधिक बळकट होईल, यात मला तीळमात्र शंका वाटत नाही.”

हेही वाचा 

Back to top button