Haryana Violence : हरियाणातील चार जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दल तैनात, इंटरनेट बंद
पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणातील नूह येथील हिंसाचारानंतर ( Haryana Violence ) राज्यातील चार जिल्ह्यांतील तणाव कायम आहे. नूह, पलवल, फरिदाबाद आणि गुरुग्रामच्या सोहना, मानेसर आणि पाटोडीमध्ये ५ ऑगस्टपर्यंत इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे. या चार जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दलाच्या वीस कंपन्या तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Haryana Violence : नूह तीन तासांसाठी संचारबंदी शिथिल
नूह येथील तावडू परिसरात बुधवारी रात्री उशिरा जमावाने दोन ठिकाणी आग लावली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आज (दि.३) जिल्ह्यात ३ दिवसांसाठी जारी करण्यात आलेल्या संचारबंदीमध्ये ३ तासांची शिथिलता देण्यात आली आहे. हरियाणा सरकारने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारतीय राखीव बटालियन (IRB) चे मुख्यालय नूह जिल्ह्यात हलवले आहे. या बटालियनमध्ये एक हजार सैनिक आहेत.
Haryana Violence : अमेरिकेनेही केले हिंसाचारावर भाष्य
दरम्यान, हरियाणा हिंसाचारावर अमेरिकेनेही भाष्य केले आहे. स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटलं आहे की, आम्ही सर्व पक्षांना हिंसाचारापासून दूर राहण्याचे आणि शांतता प्रस्थापित करण्याचे आम्ही आवाहन करतो.
हिंसाचारात आतापर्यंत ६ ठार, एकूण ५९ गुन्हे दाखल
नूह हिंसाचारात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मृतांमध्ये दोन होमगार्डचा समावेश आहे. बुधवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या त्यामुळे राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. नूह हिंसाचारप्रकरणी राज्यात पोलिसांनी एकूण ६८ गुन्हे दाखल केले आहेत. नूह येथे ११६ आणि गुरुग्राममध्ये ५० जणांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- Gyanvapi Case | वाराणसीतील ज्ञानवापीच्या सर्वेक्षणास अलाहाबाद हायकोर्टाची परवानगी
- मणिपुरातील संचारबंदी काही प्रमाणात शिथिल