पुढारी ऑनलाइन डेस्क : Nitin Gadkari on Maharashtra Politics : ज्यांना मंत्री बनण्याची आकांक्षा होती ते आता खिन्न आहेत कारण मैदानात आता इच्छुकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे शपधविधीसाठी ज्यांनी सूट शिवून ठेवले होते किंवा सूट घालून शपथविधीसाठी तयार होते त्यांच्यासमोर आता मोठा प्रश्न आहे की या सूटचे काय करायचे, अशी मिश्कील टिप्पणी करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे.
नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचाकडून आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मिश्कील टिपण्ण्या करत मंत्रिपदासाठीच्या इच्छुकांना सल्ला देखील दिला.
अजित पवार आपल्या 35-40 आमदारांच्या पाठिंब्यासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. रविवारी दोन जुलै त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ आमदरांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे विरोधी पक्षांकडून शिंदे गटात मोठी नाराजी पसरली असल्याचा दावा केला जात आहे. तसेच शिंदे गटातील काही आमदारांनी उघड-उघड याविषयी बोलूनही दाखवले आहे. एकूणच या सर्व परिस्थितीवर नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे.
यावेळी नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करताना तसेच नाराज असलेल्यालांना समाधानी आणि संतुष्ट कसे राहावे याचा सल्ल देखील दिला. त्यांनी भूतानच्या पंतप्रधानांनी प्रस्तावित केलेल्या 'डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स' या संकल्पनेचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की, बहुतांश लोक कधीच आनंदी नसतात.
"जर एखाद्या व्यक्तीने हे मान्य केले की मला माझ्या पात्रतेपेक्षा जास्त मिळाले आहे, तर ती व्यक्ती आनंदी आणि समाधानी राहू शकते," असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले.
नाहीतर नगरसेवक आमदार झाले नाहीत म्हणून नाराज आहेत, मंत्री झाले नाहीत म्हणून आमदार नाराज आहेत आणि चांगले मंत्रालय मिळाले नाही म्हणून मंत्री असंतुष्ट राहतात, असे गडकरी म्हणाले.
"…आणि आता जे (मंत्री) बनणार होते ते आपली पाळी कधी येईल का या विचाराने नाखूष आहेत, एवढी गर्दी झाली आहे," गडकरींच्या या विधानाने प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला आणि टाळ्याही मिळाल्या. ते पुढे म्हणाले, "ते सूट घालून (शपथ ग्रहण समारंभासाठी) तयार होते. आता त्या सूटचे काय करायचे हा प्रश्न आहे, (कारण) तेथे (इच्छुकांची) गर्दी आहे."
ज्या सभागृहात हा कार्यक्रम होता त्याची क्षमता 2200 होती आणि त्यात खूप लोक बसू शकतात, पण मंत्रालयाचा आकार वाढवता येत नाही, असेही गडकरी पुढे म्हणाले.
हे ही वाचा :