Cyclone Biparjoy | ‘बिपरजॉय’चा धोका; २० हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले | पुढारी

Cyclone Biparjoy | 'बिपरजॉय'चा धोका; २० हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

पुढारी ऑनलाईन: ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान या अतितीव्र झालेल्या चक्रीवादळचा मोठा प्रभाव गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टवर पडणार आहे. या नैसर्गिक संकाटाची तीव्रता लक्षात घेत, प्रशासनदेखील सतर्क झाले आहे. दरम्यान, गुजरातमधील चक्रीवादळाचा प्रभाव पडणाऱ्या काही भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आत्तापर्यंत जवळपास २० हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे, अशी माहिती गुजरात सरकारकडून स्पष्ट करण्यात आल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

बिपरजॉय चक्रीवादळचा गुजरातच्या उत्तर किनारपट्टीला मोठा फटका बसण्याची अधिक शक्यता आहे, त्यामुळे येथील प्रशासन अलर्ट मोडवर आहे. गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील 500, कच्छ-6786, जामनगर-1,500, पोरबंदर-543, द्वारकामधून 4820, गीर-सोमनाथमधून 408, मोरबी- 2,000 आणि राजकोटमधून- 4,031 इतक्या नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आल्याचे गुजरात सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश

अरबी समुद्रात तयार झालेले बिपरजॉय चक्रीवादळ आता वेगाने किनारपट्टीकडे सरकत आहे. गुजरात आणि पाकिस्तानच्या सीमेवर बुधवारी हे चक्रीवादळ धडकेल, असा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत किनारपट्टीवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. हवामान खात्याने गुजरातेत ऑरेंज अलर्ट दिला आहे. सौराष्ट्र, कच्छ भागात या चक्रीवादळाची तीव्रता अधिक राहाणार आहे. गुजरातचे सर्व समुद्रकिनारे बंद करण्यात आले आहेत. ज्या भागात वादळ धडकण्याची शक्यता आहे, त्या भागातील लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. एनडीआरएफची पथके व स्थानिक प्रशासनाची मदत व बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

‘बिपरजॉय’चा प्रभाव, गुजरातमधील ‘या’ भागात अतिमुसळधार

‘बिपरजॉय’ या चक्रीवादळामुळे १४ जून आणि १५ जून दरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे हे सर्व जिल्हे प्रभावित होण्याची शक्यता आहे. गुजरातमधील जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट असल्याने चक्रीवादळामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.

हेही वाचा:

 

Back to top button