AAP’s mega rally: मोदींची २१ वर्षे अन् माझी ८ वर्षे; कुणी जास्त काम केले बघा : अरविंद केजरीवाल | पुढारी

AAP's mega rally: मोदींची २१ वर्षे अन् माझी ८ वर्षे; कुणी जास्त काम केले बघा : अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : रामलीला मैदानावर आम आदमी पक्षाची आज (दि. ११) भव्य रॅली (AAP’s mega rally) झाली. या रॅलीला संबोधित करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. केजरीवाल म्हणाले की, देशातील जनतेचे हक्क हिरावून घेणाऱ्या केंद्र सरकारच्या हुकूमशाही अध्यादेशाविरोधात दिल्लीतील जनता रामलीला मैदानावर एकवटली आहे. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आता या देशात हुकूमशाही चालणार नाही.

केजरीवाल पुढे म्हणाले की, गुजरातचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांच्यासह मोदीजी 21 वर्षे राज्य करत आहेत आणि मी 8 वर्षे राज्य करत आहे. कोणीही मोदीजींच्या २१ वर्षांची आणि माझ्या ८ वर्षांची तुलना करावी, कोणी जास्त काम केले आहे ते पहा, असे आव्हान केजरीवाल यांनी दिले.

AAP’s mega rally : आमच्याकडे 100 मनीष सिसोदिया आहेत

केजरीवाल म्हणाले, 12 वर्षांपूर्वी याच मैदानावर आम्ही भ्रष्टाचाराविरोधात एकत्र आलो होतो. आणि आज 12 वर्षांनंतर त्याच मैदानावर पुन्हा एकदा एका अहंकारी हुकूमशहाला हटवण्यासाठी एकत्र आलो आहोत. या लोकांनी आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकले. पण त्यांना माहित नाही की आम्ही कट्टर प्रामाणिक आहोत, आमच्याकडे एक नाही. तर 100 मनीष सिसोदिया आहेत.

केजरीवाल म्हणाले की, केंद्रातील सरकारने दिल्लीतील जनतेचे हक्क हिरावून घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मला मान्य नाही, दिल्लीतील जनतेच्या मताचा मला आदर नाही, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करणार

केजरीवाल म्हणाले की, भाजपचे लोक मला रोज शिवीगाळ आणि अपमान करत आहेत. पण मला माझ्या अपमानाची पर्वा नाही. मी दिल्लीतील लोकांसाठी लढत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी कोणत्याही परिस्थितीत पालन करेन. ते म्हणाले, जो अध्यादेश दिल्लीत आणला होता, तो इतर राज्यांतही आणला जात आहे. परंतु, 140 कोटी लोक या अध्यादेशाला विरोध करतील.

AAP’s mega rally : ‘आप’च्या रॅलीत कपिल सिब्बल पोहोचले

राज्यसभा खासदार कपिल सिब्बल केंद्राच्या अध्यादेशाविरोधात काढलेल्या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी सिब्बल म्हणाले की, येत्या दिवसात मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मोदी सरकारविरोधात लोकांना सांगणार आहे की आता वेळ आली आहे. आपण एकत्र येऊन पंतप्रधान मोदींविरोधात लढण्याची गरज आहे.

हेही वाचा 

Back to top button