पंतप्रधान मोदी 'या' दोन गोष्टींवर कधी बोलत नाहीत : असदुद्दीन ओवैसी
जम्मू – काश्मीर मध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. अशा परिस्थितीत संयुक्त अरब अमिरात (युएई) मध्ये होत असलेल्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान मध्ये सामना होणार आहे. २४ ऑक्टोबर राेजी होणाऱ्या या मॅचविरोधात देशभरातून विरोध सुरू झाला आहे. गिरिराज सिंह, तारकिशोर प्रसाद यांच्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआईएमआईएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही या मॅचविरोधात भूमिका घेतली आहे. तसेच इंधन दरवाढ आणि लडाख सीमेवरील चीनच्या हालचालींवरून पंतप्रधान मोदी यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआईएमआईएम) प्रमुख असदुद्दीन आवैसी यांनी भारत-पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या क्रिकेटच्या सामन्याला विरोध केला आहे. या विरोधात बोलताना ओवैसी यांनी म्हटलं आहे की, जम्मू काश्मीरमध्ये आपले ९ सैनिक शहीद झाले आहेत. अशा परिस्थितीत २४ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान टी-२० सामना होत आहे. हे योग्य नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ दोन गोष्टींवर कधीच बोलत नाहीत…
पंतप्रधान मोदी हे पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किंमती आणि लडाखच्या सीमेवर सैन्याला घेवून बसलेल्या चीन विरोधात कधीच बोलत नसल्याचे ओवैंसी यांनी म्हटले आहे. मोदी हे चीन विराधात बोलायला घाबरतात, असा आरोपही त्यांनी केला आहे.
जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी कारवायांमध्ये झालेली वाढ. निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी पाहून देशात पाकिस्तान सोबतच्या सामन्याला होणारा विरोध वाढत चालला आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबतच राजकीय नेतेही या सामन्याला रद्द करण्याची मागणी करत आहेत. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी सामना रद्द करण्याची मागणी केली होती.यावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सामना रद्द करण्याच्या शक्यता नाकारल्या. आयसीसीशी आमच्या बांधिलकीमुळे आम्ही सामना रद्द करू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते.