Nitish Kumar vs Congress Victory: कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयामुळे बिहारच्या नितीश कुमारांना धक्का, कारण… | पुढारी

Nitish Kumar vs Congress Victory: कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयामुळे बिहारच्या नितीश कुमारांना धक्का, कारण...

पुढारी ऑनलाईन डेस्क : Nitish Kumar vs Congress Victory : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवून बहुमताचा आकडा आरामात गाठला आहे. अशातच आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षासाठी हा विजय संजीवनी ठरेल अशी चर्चा रंगली आहे. पण, दुसरीकडे या कर्नाटकी विजयोत्सवाचा झटका बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बसणार असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे.

नितीश कुमार गेल्या काही आठवड्यांपासून विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, आता क्वचितच ते विरोधकांना एकत्र आणण्याची मोहीम तितक्याच उत्साहाने पुढे नेऊ शकतील, ज्याची त्यांना पूर्वी अपेक्षा होती. त्यांनी गेल्या महिन्यात विरोधकांना एकत्र करण्याची कसरत सुरू केली होती आणि सर्वप्रथम त्यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली. (Nitish Kumar vs Congress Victory)

यासोबतच नितीश कुमार हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि डाव्या पक्षांचे नेते सीताराम येचुरी, डी राजा यांनाही भेटले.

विरोधकांकडून नितीश यांना पंतप्रधान पदाचा चेहरा मानले जात आहे?

विशेष म्हणजे, मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांना संसदेचे सदस्यत्व गमवावे लागले. तेव्हा नितीश कुमार यांनी विरोधकांना एकत्र करण्यासाठी कंबर कसली. जर राहुल गांधी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवू शकले नाहीत तर नितीश हे पंतप्रधान पदासाठी विरोधकांचा चेहरा बनून नरेंद्र मोदी यांना टक्कर देऊ शकतात, असे या खेळीचे अनेकांनी अर्थ लावले.

आता काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावणार?

शनिवारी (दि. 14) आलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाने पक्षाचा आत्मविश्वास उंचावला असून यशस्वी मोहिमेला राहुल गांधी फॅक्टर कारणीभूत ठरल्याचा काँग्रेसचा विश्वास आहे. परिणामी विरोधकांची मोट बांधण्याच्या संपूर्ण प्रयत्नांचा पुनर्विचार व्हावा असेही लगेच काही काँग्रेस नेत्यांनी खाजगी म्हटल्याचे समजते आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकी मोहिमेने काँग्रेसला नवी ऊर्जा दिली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या एकजुटीत ते महत्त्वाची भूमिका बजावून प्रादेशिक पक्षांच्या मागे न जाता त्यांचा देशपातळीवरील नेतृत्व करण्याचा मानस आहे, असे राजकीय जाणकारांना वाटते.

भाजप जिंकला तर नितीश यांना बळ मिळाले असते

कर्नाटक निवडणुकीत भाजपने विजय मिळवला तर काँग्रेस आणखीनच बॅकफुटवर गेली असती आणि याचा थेट फायदा विरोधकांना एकत्र करण्यात गुंतलेल्या नितीश कुमारांना झाला असता. नितीश हे बिहारसारख्या हिंदी पट्ट्यातून येत असल्याने ते पंतप्रधान पदाचा चेहरा बनू शकतात, अशी चर्चा रंगलेली. मात्र, कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसच्या पारड्यात बहुमत टाकले, त्यामुळे नितीश यांच्या देश पातळीवरील विरोधक जोडो मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.

बिहार सरकारमध्ये काँग्रेस मागणार आणखी दोन मंत्रीपदे?

बिहारमधील काँग्रेस पक्ष महाआघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, कर्नाटकातील विजयानंतर ते आता नितीश कुमार सरकारमध्ये आणखी दोन मंत्रिपदांची मागणी करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच बिहारचे मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकतात, ज्यावर कर्नाटक निवडणूक निकालाचा प्रभाव दिसू शकतो, असेही राजकीय विश्लेषकांच्या मत आहे. (Nitish Kumar vs Congress Victory)

Back to top button