

पुढारी ऑनलाइन डेस्क : Manipur Violence :मणिपूरमध्ये काल आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर मणिपूरमध्ये परिस्थिती चिघळली. आहे. मणिपूरच्या गावांमधून तब्बल 9000 हून अधिक लोकांना मदत छावण्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान, सरकारने व्यापक दंगल रोखण्यासाठी आसाम रायफलच्या 55 तुकड्या तैनात केल्या आहेत. तसेच 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली असून मणिपूरला जाणाऱ्या सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.
मणिपूरमध्ये, मेईतेई/मीतेईचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीच्या निषेधार्थ बुधवारी (दि.३) ऑल ट्रायबल्स स्टुडंट्स युनियनच्या (एटीएसयू) वतीने मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक सहभागी होते. दरम्यान, मोर्चात सहभागी आंदोलकांमध्येच अचानक हिंसाचार उसळला. या दरम्यान चुराचांदपूर येथे तणावाचे वातावरण असताना जमावाने घरांची तोडफोड आणि जाळपोळ (Manipur Violence) केली.
हिंसाचारानंतर (Manipur Violence) काही काळासाठी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे आंदोलन अधिकच चिघळले. मणिपूरमध्ये आदिवासी आणि बहुसंख्य मेईतेई समुदाय यांच्यात संघर्ष सुरू आहे. या संघर्षाचे पडसाद अधिक तीव्र होताना दिसत असून राज्यातील अनेक भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मणिपूरच्या राज्यपालांनी गृह विभागाला दंगलखोरांना दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी (दि. 3) आदिवासी एकता मार्चदरम्यान घडलेल्या हिंसाचारात कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर हा आदेश गुरुवारी (दि. 4) जारी करण्यात आला आहे.
ईशान्य फ्रंटियर रेल्वेने मणिपूरकडे जाणाऱ्या सर्व गाड्या थांबवल्या आहेत. "परिस्थिती सुधारेपर्यंत कोणतीही ट्रेन मणिपूरमध्ये दाखल होणार नाही. मणिपूर सरकारने ट्रेनची वाहतूक थांबवण्याचा सल्ला दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे," एनएफ रेल्वेचे सीपीआरओ सब्यसाची डे यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर सरकारने हिंसाचार करणाऱ्या दंगलखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी हिंसाचारग्रस्त भागात कलम 144 लागू करण्यात आले होते. राज्यात पुढील 5 दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. वास्तविक बुधवारी आदिवासींच्या निदर्शनादरम्यान हिंसाचार झाला. यानंतर 8 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. लष्कर आणि आसाम रायफल्सच्या 55 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 9000 लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.
आसाम रायफल्सच्या चौकीवर झालेल्या हल्ल्याच्या व्हिडिओसह मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचे खोटे व्हिडिओ निहित स्वार्थासाठी वैमनस्यपूर्ण घटकांकडून प्रसारित केले जात आहेत. भारतीय सैन्याने सर्वांना केवळ अधिकृत आणि सत्यापित स्त्रोतांद्वारे सामग्रीवर अवलंबून राहण्याची विनंती केली आहे.
हे ही वाचा :