Gati shakti yojana आत्मनिर्भर भारताचा मजबुत पाया ठरेल : पीएम मोदी | पुढारी

Gati shakti yojana आत्मनिर्भर भारताचा मजबुत पाया ठरेल : पीएम मोदी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

देशात यापूर्वी ‘वर्क इन प्रोग्रेस’ची (Gati shakti yojana) पाटी म्हणजे सरकारी व्यवस्थेवरील अविश्वासाचे प्रतिक ठरत होता. पंरतु, २०१४ नंतर केंद्र सरकारने आपल्या कार्यशैलीत बदल केला, त्यामुळे पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेपूर्वीच पूर्ण होण्यास आता प्रारंभ झाला आहे. त्यास आणखी गती देण्यासाठी ‘पंतप्रधान गतीशक्ती’ योजना आत्मनिर्भर भारताचा मजबुत पाया ठरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.

आत्मनिर्भर भारताच्या संकल्पासह पुढील २५ वर्षांच्या भारताच्या विकासाचा संकल्प घेऊन केंद्र सरकार काम करीत आहे. त्यासाठी एकविसाव्या शतकातील भारताच्या नवनिर्माणासाठी देशात पायाभूत सुविधांचा विकास करणे अत्यंत गरजेचे आहे. पायाभूत सुविधा विकासाला गती देण्यासाठीच पंतप्रधान गतीशक्ती योजनेचा (Gati shakti yojana) प्रारंभ करण्यात आल्याचे ते म्हणाले.

याद्वारे सरकारी धोरणे— पायाभूत सुविधा प्रकल्पांची आखणी आणि त्याची अंमलबजावणी निर्धारीत वेळेत पूर्ण होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या प्रत्येक विभागामध्ये समन्वय साधला जाणार आहे. या योजनेच्या केंद्रस्थानी देशातील जनता, उद्योग आणि व्यापारक्षेत्र, शेतकरी आणि ग्रामीण भारत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

देशात दशकांपर्यंत सरकारी व्यवस्थेच्या कार्यशैलीमुळे सरकारी या शब्दाविषयी नकारात्मक भावना निर्माण झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, वर्क इन प्रोग्रेस ही पाटी सरकारविषयीच्या अविश्वासाचे प्रतीक बनली होती. जनतेचा पैशाची नासाडी होत असल्याविषयी सरकारलाही काही वाटत नसे.

पंरतु,२०१४ नंतर भारत आता जुनी व्यवस्था टाकून पुढे जात आहे. पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेळेत आणि शक्यतो वेळेपूर्वीच पूर्ण केले जात आहेत. केंद्र सरकारचे विविध मंत्रालये, विभाग आणि राज्य सरकारसोबत समन्वय साधला जात आहे. यामुळे आत्मनिर्भर भारतचे लक्ष्य साधण्यासाठी खऱ्या अर्थाने गती देण्याचे काम पंतप्रधान गतीशक्ती योजना (Gati shakti yojana) करणार असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.

हे ही वाचलं का?

Back to top button