Weather Update In IND : येत्या काही दिवसात 'उष्णता' वाढणार; जाणून घ्या, काय आहे कारण?
पुढारी ऑनलाईन डेस्क : येत्या काही दिवसात भारतातील अनेक भागांतील कमाल तापमानात वाढ होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे पुढील काही दिवस केरळसह दक्षिणेकडील अनेक राज्यात ढगांच्या गडगडाटांसह वादळी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस (Weather Update In IND) पडणार आहे. तसेच पुढचे काही दिवस देशातील अनेक भागात कमाल तापमान ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढणार आहे. परंतु, या दिवसात भारतातील कोणत्याच भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा नसल्याचे देखील हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
केरळला वादळी पावसाचा इशारा
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य भारत आणि पश्चिम हिमालयात या दरम्यान तापमान सर्वसामान्य राहणार आहे. या हवामानाचा भारताच्या दक्षिणेकडील भागावर प्रभाव जाणवणार असून, पुढचे पाच दिवस केरळला (Weather Update In IND) ढगांच्या गडगडाटांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Gradual rise in maximum temperature by 3-5°C over most parts of the country during next 3-5 days. pic.twitter.com/9imB1UQELY
— India Meteorological Department (@Indiametdept) April 9, 2023
Weather Update In IND: उष्णता वाढण्याचे नेमकं कारण?
केरळ ते मध्य महाराष्ट्रापर्यंत कर्नाटक राज्य पार करून द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे; तर बांगलादेशच्या ईशान्य भागात हवेच्या वरच्या भागात उष्णकटिबंधीय वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. हे उष्णकटिबंधीय वारे केरळ, विदर्भ, कर्नाटक आणि मराठवाड्यातून वाहत असून, दक्षिणेकडील भगावर या स्थितीचा प्रभाव वाढत आहे. याबरोबरच पश्चिम राजस्थान भागातही चक्रीय स्थिती कार्यरत आहे. या सर्व स्थितीमुळे मध्य आणि दक्षिण भारतात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जोर वाढणार असल्याचे देखील भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यात अवकाळीचा दणका सुरूच असून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात आणखी दोन दिवस गारपीट सुरूच राहणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, नंदुरबार, नाशिक, धुळे, नगर, पुणे, जळगाव, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बीड, सोलापूर, धाराशिव यांसारख्या १८ जिल्हयांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.