पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरातील रेल्वे मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावण्यासाठी सज्ज झाली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस ही जम्मू-काश्मिरमधील रेल्वे मार्गांवर धावताना दिसणार आहे. विशेष म्हणजे ही रेल्वे चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच पुलावरून धावणार आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, उधमपूर-श्रीनगर-बारामुला (USBRL) हा रेल्वेमार्ग सुरु झाल्यानंतर जम्मू आणि श्रीनगर जोडले जाणार आहे. रेल्वे मंत्री वैष्णव यांनी सांगितले की, 'युएसबीआरएल' प्रकल्प डिसेंबर २०२३ किंवा २०२४ पर्यंत पूर्णृ होईल. हा रेल्वे मार्ग सुरु झाला की, वंदे भारत एक्सप्रेस येथे धावण्यास सज्ज होईल.
चिनाब नदीवरील पूल हा नदीच्या तळापासून ३५९ मीटर उंचीवर असलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. हा उंच रेल्वे पूल मार्ग बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. कटरा ते बनिहाल अशा १११ किलोमीटर लांबीच्या या मार्गावरील १.३ किलोमीटर लांबीचा पूल अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. १४८६ कोटी रुपये खर्च करुन कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत या पूलाचे बांधकाम सुरु आहे.
या पुलाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे हा पूल ताशी २६६ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यालाही सहज तोंड देऊ शकेल. शिवाय येथे भूकंपासारख्या दुर्घटनांमध्ये देखील हा पूल सुरक्षित राहील, असा दावा केला जात आहे. 'यूएसबीआरएल' प्रकल्प जम्मू आणि काश्मीरला उर्वरित भारताशी जोडेल आणि सर्व हवामान कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. तसेच, भारतीय रेल्वे देखील जलद गतीने काम करत आहे आणि देशभरातील विविध मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवत आहे. येत्या काळात इतर अनेक राज्यांना वंदे भारत गाड्या मिळणार आहेत.
हेही वाचा