G-20 : एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य; दिल्लीतील जी-२० परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचा नारा | पुढारी

G-20 : एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य; दिल्लीतील जी-२० परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचा नारा

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा; ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ यातून उद्दिष्टाची एकता आणि कृतीतील एकतेच्या गरजेचेही संकेत मिळतात. जी – २० बैठकीची संकल्पना वैश्विक पातळीवरील उद्दिष्टे आणि कृती या दोन्हीसाठी एकत्र येण्याची गरज दर्शवणारी आहे. आजच्या या बैठकीतून सामूहिक आणि ठोस उद्दिष्टांसाठी एकत्रित येण्याची भावनाच व्यक्त होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. जी-२० परिषदेतील देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते. (G-20)

श्रीमंत देशांची धोरणे आणि कृतीमुळे निर्माण झालेल्या हवामान बदलाच्या संकटाचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना बसत असल्याची घणाघाती टीकाही मोदी यांनी केली. जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्था म्हणून या ठिकाणी उपस्थित नसलेल्यांची जबाबदारीदेखील आपल्यावर, हा मुद्दा विशेषत्वाने पंतप्रधानांनी नमूद केला. महायुद्धोत्तर काळानंतर भविष्यातील युद्ध रोखण्यात आणि सामायिक हितांच्या मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्याची भावना रुजवण्याच्या कर्तव्यात जागतिक नियामक व्यवस्था अपयशी ठरल्या. या पार्श्वभूमीवर, भारताच्या – जी-२० अध्यक्षपदाने जगाच्या दक्षिणेकडील देशांना आवाज देण्याचा प्रयत्न केल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.

गेल्या काही वर्षांपासून जगातील वित्तीय संकट, हवामान बदलाचे संकट, महामारी, दहशतवाद आणि युद्धजन्य परिस्थिती बघितल्यास जागतिक नियामक संस्थांच्या संस्थापक अपयशी ठरल्याचे दिसून येते. या अपयशाचे सर्वाधिक भयावह परिणाम विकसनशील देशांना भोगावे लागले. इतक्या वर्षांच्या प्रगतीनंतरही जग आज शाश्वत विकासासाठी चाचपडत आहे. अनेक विकसनशील देश आजसुद्धा आपल्या नागरिकांना अन्न, ऊर्जा सुरक्षा पुरविण्याच्या प्रयत्नात असताना अनिश्चित कर्जाच्या सापळ्यात अडकल्याचे दिसते, अशी खंत पंतप्रधानांनी बोलून दाखवली.

जग विभागले गेले असतांना परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत आजच्या भूराजकीय परिस्थितीचे सावट असणे स्वाभाविक आहे. परंतु, तणाव दूर करण्यासाठी सर्वांची आपली एक भूमिका आणि दृष्टिकोन आहे. विकास, आर्थिक बळकटी, संकटांशी सामना करण्याची , शक्ती, आर्थिक स्थैर्य, आंतरराष्ट्रीय गुन्हे, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि अन्न तसेच उर्जा सुरक्षा, यासाठी संपूर्ण जग जी-२० कडे डोळे लावून मोदी म्हणाले. बसले आहे, असेही मोदी म्हणाले.

G-20 : चीनसह चाळीस देशांचे प्रतिनिधी उपस्थित

चाळीस देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले आहेत. जागतिक पातळीवर महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याच्या हेतूने भारताने जी-२० समूहाखेरीज अन्य देशांच्या प्रतिनिधींनाही आवर्जून आमंत्रित केले आहे.

चीन साधणार रशियाशी सुसंवाद

चीनने रशियाशी आपली चर्चा विविध पातळ्यांवर सातत्याने होतच राहणार असल्याचे या बैठकीच्या निमित्ताने स्पष्ट केले आहे. ही माहिती चीनचे परराष्ट्र मंत्री क्विन गॅन्ग यांनी दिली. ‘युक्रेन’च्या विषयावर त्यांनी आपल्या देशाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, हा विषय रशिया आणि युक्रेन यांनी सामोपचाराने मिटवावा, अशी आमची धारणा आहे.

रायसीना डायलॉगचे पर्व सुरू

एकीकडे जी-२० परिषदेची बैठक सुरू असताना नवी दिल्लीत रायसीना डायलॉगच्या पर्वालाही सुरुवात झाली आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहेत. चार मार्चपर्यंत चालणाऱ्या या डायलॉगसाठी जगभरातील १०० देशांचे प्रतिनिधी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत.

मोदी इज द बेस्ट : मेलोनी

इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी ‘रायसीना डायलॉग’च्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात आवडते नेते आहेत. ते किती मोठे नेते आहेत, हे जगभरात सिद्ध झालेले आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन, अशी प्रशंसा केली. ही प्रशंसा ऐकून दुसऱ्या व्यासपीठावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हसताना दिसले.

जी-२० ची भूमिका महत्त्वाची

जी-२० कडे या मुद्द्यांवर एकमत घडवून आणण्याची आणि ठोस परिणाम देण्याची क्षमता आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जागतिक संकटांच्या बाबतीत जे मुद्दे आपण एकत्र बसून सोडवू शकतो त्यात, जे मुद्दे सोडवता येऊ शकत नाहीत त्यांचा अडथळा व्हायला नको, यावर त्यांनी भर दिला. ही बैठक गांधी आणि बुद्ध यांच्या देशात होत आहे, हे अधोरेखित करून पंतप्रधानांनी सर्व परराष्ट्र मंत्र्यांना भारताच्या सांस्कृतिक भावनेतून प्रेरणा घेऊन, आपल्याला विभागणाऱ्या गोष्टींकडे न बघता, ज्या गोष्टी आपल्याला एकत्र आणू शकतात, याकडे लक्ष देण्याची त्यांनी विनंती केली.

हेही वाचा

Back to top button