Covid vaccination : भारतात कोविड लसीकरण मोहिमेमुळे ३४ लाखाहून अधिक लोकांचे जीव वाचले; अहवालात स्पष्ट | पुढारी

Covid vaccination : भारतात कोविड लसीकरण मोहिमेमुळे ३४ लाखाहून अधिक लोकांचे जीव वाचले; अहवालात स्पष्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक महामारी कोरोनाने अख्ख्या जगाला हादरवून सोडले होते. यात जीवित हानी मोठ्या प्रमाणात झाली. कोरोनाचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मोठे परिणाम झाले. अनेकांचे या महामारीत जीव गेले. भारताने ही महामारी आटोक्यात आणण्यासाठी कोविड-१९ लसीकरण मोहीम हाती घेतली. या मोहिमेमुळे तब्बल ३४ लाखाहून अधिक लोकांचे जीव वाचले आहेत. हे एका अहवालात स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर बातमी. (Covid vaccination)

Covid vaccination : ३४ लाखाहून अधिक लोकांचे जीव वाचले

भारत सरकराने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सुरु केलेल्या लसीकरण मोहीमेने २०२१ मध्ये तब्बल ३४ लाखाहून अधिक लोकांचे जीव वाचवण्यात यश आले आहे. असे स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या अहवालात म्हटले आहे. याबाबत माहिती अशी की, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिटय़ूट फॉर कॉम्पिटिटिव्हनेसद्वारे ‘हीलिंग द इकॉनॉमी: एस्टीमेटिंग द इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑन इंडियाज लसीकरण आणि संबंधित समस्या’ या नावाचा एक अहवाल तयार केला आहे. यात हे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही म्हंटलं आहे की, १८.३ अब्ज डॉलरचे नुकसान रोखून या मोहिमेचा सकारात्मक आर्थिक परिणाम देखील झाला आहे.

लसीकरणाद्वारे (कार्यरत वयोगटातील) वाचवलेल्या जीवनाची एकत्रित आयुष्यभराची कमाई २१.५ अब्ज डॉलर पर्यंत वाढली आहे. शिवाय, लसीकरणाने वृद्धांचे प्राणही वाचवले असल्याने, यामुळे अप्रत्यक्षपणे आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर परिणाम होण्यापासून रोखण्यात मदत झाली आणि त्यामुळे विद्यमान आरोग्य पायाभूत सुविधांचा अधिक विवेकपूर्ण वापर करण्यात आला. असं अहवालात म्हंटलं आहे.

‘द इंडिया डायलॉग’

इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पिटिटिव्हनेस आणि यूएस-एशिया टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट सेंटर, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी यांनी संवादाचे आयोजन केले होते.  लसीकरण आणि संबंधित बाबींचा आर्थिक प्रभाव यावरील ‘द इंडिया डायलॉग’ सत्राला संबोधत असताना आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले,”जानेवारी २०२० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोविड-१९ ला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्याआधी, महामारी व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विविध प्रक्रिया आणि संरचना तयार केल्या गेल्या होत्या. पुढे बोलताना असेही म्हणाले की, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताने ‘संपूर्ण सरकार’ आणि ‘संपूर्ण समाज’ दृष्टिकोन स्वीकारला आहे.  कोविड -१९ च्या प्रभावी व्यवस्थापनासाठी सर्वांगीण प्रतिसाद धोरण स्वीकारला आहे.

कोरोनापासून काळजी म्हणून लॉकडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊनच्या परिणामावरही या अहवालाने प्रकाश टाकला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सांख्यिकीय विश्लेषणाचा संदर्भ देत अहवालात म्हंटलं आहे की, कोविड-१९ ची संख्या ११ एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊनशिवाय सुमारे दोन लाख (०.२ दशलक्ष) पर्यंत पोहोचली असती.

हेही वाचा

Back to top button