अदानींबाबत विचारलेल्या प्रश्नांवर पंतप्रधान गप्प का? : राहुल गांधी | पुढारी

अदानींबाबत विचारलेल्या प्रश्नांवर पंतप्रधान गप्प का? : राहुल गांधी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  उद्योजक गौतम अदानी यांच्यासंदर्भात मंगळवारी मी लोकसभेत जे प्रश्न विचारले त्यांचे उत्तर पंतप्रधान का देत नाहीत, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारला आहे.

मंगळवारी लोकसभेत बोलत असताना राहुल यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतम अदानी यांच्यातील संबंधांवरून हल्लाबोल केला होता. त्यानंतर बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल यांच्या भाषणातला काही भाग वगळण्यात आल्याचे सांगितले. भाषण रेकॉर्डवरून हटविल्यानंतर ते चांगलेच संतापले. आज ते संसदेत आले असताना माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी माध्यमांना संतापून विचारले की, माझ्या भाषणातले मुद्दे का काढण्यात आले? पत्रकारांनी पुन्हा एकदा त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा राहुल गांधी म्हणाले, माझ्या प्रश्नांवर पंतप्रधान उत्तर का देत नाहीत? ते अदानींना का वाचवू पाहत आहेत?

Back to top button